मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे सात ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल, असे ते म्हणाले.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे ते म्हणाले.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण होत आहे. रुग्ण बरे होणार्यांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील जवळपास सर्वच सेवा, व्यवहार सुरळीत सुरू आहेत.
केवळ शाळा, महाविद्यालये, मंदिरे बंद होती मात्र आता ते देखील टप्प्या टप्प्याने पुढील महिन्यात उघडण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Post a Comment