नगर : येथील वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आशा कदम- चव्हाण यांनी आयुर्वेदीक गर्भनिरोधक औषधाच्या फॉर्मुल्याचे (हर्बल ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह फॉर्मुल्याचे) पेटंट मिळवले आहे. नगरच्या वनस्पती शास्त्र संशोधन क्षेत्रासाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.
नगर जिल्ह्यातील कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. आशा कदम-चव्हाण यांनी तब्बल १० वर्षे सखोल संशोधन आणि प्रयोग करून हे आयुर्वेदिक गर्भनिरोधक औषध शोधून काढले आहे.
या संशोधनात त्यांना त्यांचे मार्गदर्शक अहमदनगर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. बी एम गायकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संशोधन कार्याची आणि त्यांना प्राप्त झालेल्या पेटंटची माहिती दिली.
या फॉर्मुल्याचा उपयोग करून लवकरच नामांकित औषध निर्माता कंपनीच्या मदतीने हे आयुर्वेसर्र्लेट किंवा लिक्वीड स्वरूपात बाजारात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
या संशोधनाविषयी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की , वनस्पतीशास्त्र विषयाचा अभ्यास करीत असताना मला माझ्या शिक्षकांकडून संशोधनाची प्रेरणा मिळाली. बहुतेक गर्भ निरोधक औषधांचे स्त्रियांच्या शरीरावर घातक दुष्परिणाम होतात.
वारंवार ही औषधे घेऊन गर्भ धारणा थांबविणाऱ्या महिलांना जेव्हा मूल हवे असते तेव्हा त्या गोळ्या घेणे थांबवितात. पण गर्भ धारणेत अडचणी निर्माण होतात. काही स्त्रियांना तर गर्भ रहातच नाही.
अनेक वेळा या बाबतीत ते दाम्पत्य निपुत्रिक राहण्याचा धोका असतो. तसेच या गोळ्या घेणाऱ्या महिलांना थायरॉइड्स वाढणे, हार्मोन्स मध्ये बदल होणे, शरीर स्थूल होणे, शरीरात चरबीचे प्रमाण वाढणे असे परिणाम होतात.
त्याची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. पण ग्रामीण भागात विशेषत: दुर्गम आदिवासी भागात जिथे साधा प्राथमिक उपचाराचा दवाखाना किंवा मेडिकलचे दुकान देखील नाही. त्या ठिकाणी राहणाऱ्या महिला गर्भ धारणा टाळण्यासाठी काय उपाय करीत असतील याचा अभ्यास मी केला.
नगर जिल्ह्यातील अकोले, भंडारदरा या भागात वारंवार जाऊन तेथील महिलांना भेटून ते करीत असलेल्या उपायांची तसेच त्या खात असलेल्या झाडपाल्याची , बिया आणि साल याविषयी माहिती घेऊन सखोल संशोधन केले. या महिला औषधी झाडाची पाने , साली, बिया खात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपण औषध शोधून काढले.
वारंवार प्रयोग करून हा फॉर्मुला तयार झाल्यानंतर भारत सरकारच्या राष्ट्रीय विष विज्ञान केंद्र (नॅशनल टॉक्सीकॉलॉजी सेंटर) पुणे येथून हा फॉर्मुला तपासून घेतला व मान्यता मिळवली . हे औषध शंभर टक्के आयुर्वेदिक असून यशाची टक्केवारी १०० आहे.
तसेच या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, असे त्या म्हणाल्या. आशा कदम - चव्हाण या नगरच्या असून त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात डॉक्टरेट (पीएचडी) मिळवली आहे. त्यांचे पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण नगरच्या राधाबाई काळे महाविद्यालय तसेच न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात झाले आहे.
त्यांना मलेशिया येथे आंतर राष्ट्रीय पातळीवरील इनोव्हेशन अँड डेडिकेटेड टिचिंग फॅकल्टी अवॉर्ड, तसेच पुद्दुचेरी येथे नॅशनल सायन्स अँड टेक्नॉलॉजी नॉव्हेल रिसर्च अकॅडमीचा बेस्ट वुमन सायंटिस्ट अवॉर्ड मिळालेले आहेत. त्यांच्या नावावर २३ रिसर्च पेपर असून त्यांनी १ संदर्भ ग्रंथ लिहिलेला आहे.
त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष, नंदकुमार झावरे, सेक्रेटरी जी. डी. खानदेशे, न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. झावरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य शिवाजी साबळे, अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य मा.राजेंद्र फाळके साहेब, कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. बाळ कांबळे, तसेच प्रा. डॉ. भाऊसाहेब औटी, विद्यमान प्राचार्य प्रा.डॉ. संजय नगरकर, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सर्व पदाधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक आणि सर्व प्रशासकीय सेवक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
ह्या कामी त्यांचे पती श्री गजानन सावंत आणि परिवार तसेच सर्व स्नेही , नातेवाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post a Comment