निघोज : निघोज ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच नऊ फेब्रुवारी २०२१ला झालेली निवड प्रक्रिया रद्द करावी म्हणून ग्रामपंचायत सदस्य दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी १५ मार्च २०२१ ला जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता.
त्या विवाद अर्जावर जिल्हाधिकारी यांनी दि. ७ ऑक्टोंबर २०२१ ला संबंधित विवाद अर्ज हा वेळेत दाखल केलेला नाही. तसेच निवड प्रक्रिया ही ग्रामपंचायत अधिनियम ३५ (ब) प्रमाणे योग्य असून संबंधित विवाद अर्ज हा जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळला होता.
परंतु जिल्हाधिकारी यांच्या निकालाच्या विरोधामध्ये लाळगे व कवाद यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांच्याकडे दि. २० ऑक्टोबर २०२१ ला अपील केले. जवळजवळ पाच महिने संबंधित प्रकरण नाशिक आयुक्तांसमोर चालू होते. कवाद व लाळगे यांच्या बाजूने अँड. भगत यांनी बाजू मांडताना सबंधित प्रकरणांमध्ये दोन सदस्यांचे अपहरण झाले.
त्या प्रकरणांमध्ये आरोप झालेल्यांना अटक करण्यात आली होती. जर माझे पक्षकार निवड प्रक्रियेमध्ये सहभागी असते तर सरपंच व उपसरपंच पदाचा निकाल वेगळा लागला असता असे अनेक मुद्दे मांडण्यात आले.
परंतु समोरून वराळ गटाच्या बाजूने अँड. संकेत ठाणगे यांनी बाजू मांडताना माझ्या पक्षकारांना खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवण्यात आले व त्यांनाच निवड प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला परंतु खेड न्यायालयाने तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन मंजूर करून माझ्या पक्षकारांना निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली.
सदर निवडप्रक्रिया ही ग्रामपंचायत अधिनियमाला धरून पार पडलेली आहे. सदर निवड प्रक्रियेमध्ये माझ्या पक्षकार चित्रा सचिन वराळ यांना नऊ मतदान तर समोरील सुधामती विठ्ठल कवाद यांस सहा मतदान झाले.
माझ्या पक्षकार चित्रा सचिन वराळ ह्या बहुमताने सरपंच झाल्या. समोरील कवाद व लाळगे हे मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी जरी झाले असते तरी माझे पक्षकार चित्रा सचिन वराळ यांना कुठलाही फरक पडत नव्हता.
माझ्या पक्षकार वरती जो अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये मा. न्यायालयाने त्यांना दोषी ठरविलेले नाही म्हणून संबंधित प्रकरण हे निकाली काढून समोरच्याचे अपील फेटाळण्यात यावे.
दोन्ही बाजूंचे युक्तीवाद एकूण अप्पर आयुक्त नाशिक यांनी दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांचे अपील फेटाळून जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेश कायम ठेवला .
दरम्यान नाशिक आयुक्तांच्या या निकालाने वराळ गटांमध्ये जल्लोषाचे वातावरण तर विरोधी गटांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.
निघोज ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्पष्ट कौल हा संदीप पाटील वराळ जनसेवा पॅनलच्या बाजूने दिलेला असताना ज्यांना जनतेने नाकारले त्यांना मात्र हा कौल मान्य नव्हता. संबंधित निकाल हा जनतेच्या दिलेल्या कौलाच्या बाजूने लागल्याने आनंद होत आहे. - चित्रा सचिन वराळ पाटील, सरपंच, निघोज ग्रामपंचायत
Post a Comment