जालना ः मराठवाड्यात जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशीव मतदारसंघात ‘जरांगे फॅक्टर’ प्रभावी ठरला आहे. त्यामुळेच २५ वर्षांची दानवे यांची जिल्ह्यातील सत्ता जनतेने उलथवून लावली. दुसरीकडे नांदेडमध्ये काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण व हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकर यांनी विरोधी उमेदवारांना आस्मान दाखवले.
परभणी मतदारसंघात महाविकास आघाडीचे संजय जाधव विजयी झाले.जालना मतदारसंघात भाजपचे रावसाहेब दानवे यांना अनेक गावात मराठा आंदोलकांनी विरोध झाला होता. सत्ताधाऱ्यांच्या रोषातील एक लाखापेक्षा अधिक मतदान अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांच्याकडे वळूनही काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे मोठ्या मतांनी विजयी झाले.
नांदेड जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाण यांना गावबंदी केली होती. या मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले. हिंगोली मतदारसंघात महाविकास आघाडीचे नागेश आष्टीकर विजयी झाले.
मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यात भाजप उमेदवारांना चांगलाच फटका बसला आहे. राज्यातील इतरही भागात थोड्या फार प्रमाणात भाजप उमेदवारांना फटका बसला आहे. मात्र सर्वाधिक फटका मराठवाड्यातील उमेदवारांना बसला आहे. त्यामुळे राज्यात भाजपाचीच नव्हे महायुतीची पिछेहाट झालेली आहे.

Post a Comment