राहाता : स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांची सहकारामध्ये कोणतेही राजकारण न आणण्याची भावना होती. या भावनेचा आदर करुन माजी मंत्री बाळासाहेब थोरात व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांनी दोन्ही कारखाने बिनविरोध केले. असा गौप्यस्फोट माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला. तर, इकडेही एक माजी खासदार अध्यक्ष झाले आणि तिकडेही एक माजी मंत्री अध्यक्ष झाले अशी मिश्किल टिप्पणी देखील सुजय विखे यांनी केली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील व संगमनेर तालुक्यातील खळी, पिंप्री – लौकी अजमपुर, शिबलापूर येथे निळवंडे पाण्याचे जलपुजन, तसेच शिबलापुर येथे महावितरणच्या नवीन उपकेंद्राचे भुमीपुजन व बहिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरणाचे उद्घाटन डॉ. विखे यांच्या हस्ते पार पडले.
विखे म्हणाले की, संगमनेरच्या आमदारासाठी फक्त सहा ठिकाणी घेतलेल्या प्रभावी सभा, मनात विश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याने त्याचा फायदा अमोल खताळ यांना झाला.
या निवडणुकीत संगमनेरच्या माजी आमदाराने विकासाची कामगिरी मांडण्याऐवजी नकारात्मक व खालच्या पातळीवर टिका केल्याने त्यांना या निवडणुकीत जनतेने नाकारले अशी बोचरी टिका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता त्यांच्यावर करताना द्वेषाचे नव्हें तर, विकासाचे राजकारण करण्याचा सल्लाही त्यांना दिला. तसेच जोपर्यत बाळासाहेब थोरात माझे भावीचं स्वप्न पुर्ण करत नाही.
तोपर्यत थोरात यांची गॅरंटी नाही, असा खोचक टोला देखील डॉ. विखे यांनी थोरात यांना लगावला. तर, आमदार अमोल खताळ यांना विकास कामे करुन द्या, असे आवाहन विखे यांनी केले.
सर्वसामान्यांच्या आशीर्वादावर राधाकृष्ण विखे यांना जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली म्हणूनच आपल्याला पाण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार नाही. संगमनेर विधानसभा मतदार संघात भोजापूर चारीचे पाणी तळेगाव गटाला मिळत नाही आणि साकुरची जलसिंचन योजना मार्गी लागत नाही, तोपर्यत संगमनेर विधानसभेत सत्कार स्विकारणार नसल्याचे विखे यांनी सांगितले. तर, दोन महिन्यांत भोजापूर चारीचे भुमीपुजन करुन पाणी देण्याची ग्वाही यावेळी दिली.
Post a Comment