अत्यावश्यक सेवेबरोबर किराणा व इतर काही घटकांना सकाळी उघडण्यास परवानगी....


नगर : जिल्ह्यात आता अत्यावश्यक सेवा बरोबरच किराणा दुकाने व इतर काही घटकांना सकाळी सात ते सकाळी अकरा या वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढून पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज (बुधवारी) तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. 

यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, उर्मिला पाटील, पल्लवी निर्मळ, जयश्री आव्हाड, रोहिणी नऱ्हे,  जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके हे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होईल, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी जागरूक राहावे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना आणि व्यक्तीवर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. 

आपण दैनंदिन चाचण्यांची संख्या आता वाढविली आहे. त्याप्रमाणे काही तालुक्यांत तसेच नगरपालिका क्षेत्रात चाचण्या होत आहेत. 

आज जिल्ह्याने २५ हजार चाचण्या एकाच दिवशी केल्या आहेत. आपण काही व्यवहार ठराविक कालावधीत सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी कोरोनाचा धोका अजुन संपलेला नाही. 

संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचारही आपल्याला करावा लागणार आहे. त्यामुळे, याठिकाणी गर्दी वाढणार नाही, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे. 

नागरिकांनीही व्यवहार सुरू झाले म्हणून एकाचवेळी गर्दी करणे टाळले पाहिजे, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post