१२ वर्षांपूर्वी मेलेला मुलगा जीवंत गावात पोहचतो तेव्हा... घोटवीमधील तरुणांमध्ये त्यांना देव दिसला..


 अमर छत्तीसे

श्रीगोंदा : साधारणत: तीन वर्षापूर्वी एक भिक्षेकरी घोटवी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकरी शंकरकाका बारगुजे यांच्या पाण्याच्या टाकीवर पाणी पिण्यास थांबला अन् तेथेच बसून राहिला. त्यांचा मुलगा नीलेश याने त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु तो काय बोलतोय हे काहीच कळत नव्हते. त्याच्या अवस्थेवरून तो भुकेला आहे. हे जाणवत होते. त्यांनी त्याला जेवण दिले, त्यांच्या या वागण्याने त्याची भीती थोडीशी कमी झाली. 

बारगुजे कुटुंबाविषयी त्याला विश्वास निर्माण झाला आणि तो जवळ जवळ तीन वर्ष त्यांच्या घरीच राहिला. या कालावधीत नीलेशची त्याच्याशी मैत्री झाली. त्याच्याविषयी मनात आपुलकी निर्माण झाली. 

नीलेशचा भाऊ  शेती उद्योजक महेश बारगुजे यांची मात्र या पाहुण्याला त्याच्या घरी कसे सोडवता येईल, ही तळमळ चालू होती. या आगंतुक पाहुण्याला त्याच्या घरी कुटुंबात पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपण काहीही करून ते साध्य करू असे त्याला मनोमन वाटत होते.

मात्र भाषा ही मोठी अडचण होती. या पाहुण्याला त्याच्या घरी पोहोचवायचेच हा चंग बांधला.काही दिवस गेल्यानंतर तो तरुण त्याचे नाव आणि गावाचे नाव इंग्रजी भाषेत लिहून दाखवू लागला. त्याचे नाव के पलानी मुरुगन व गावाचे नाव तामिळनाडू राज्यातील मुक्कुडी. परंतु तिथे जायचं कस हा सांगतोय ते खर आहे का? हे कळत नव्हत. 

त्यानंतर बाबासाहेब बारगुजे व त्यांचे बंधू बाळासाहेब बारगुजे यांना अचानक त्यांचा बंगलोरमधील त्यांचा व्यापारी मित्र एन शेखर याची आठवण झाली. तो मुळचा तामिळनाडूचा मग फोन वरून त्यांनी या दोघांचे बोलणे करून दिले.

त्याच्याशी बोलल्यानंतर त्या व्यापारी मित्राने त्या तरुणाचे गाव मदुराईपासून ३५ किमी वर एक छोटेसे खेडेगाव असल्याचे सांगितले. अन प्रवास चालू झाला. त्या तरुणाला त्याच्या घरी पोहचवण्याचा. 

महेश बारगुजे यांनी स्वतःची गाडी घेतली, त्याच्या बरोबर वैभव बारगुजे, निलेश बारगुजे, दीपक बारगुजे व अनिल निंभोरे हे सर्व निघाले.. भाषेची अडचण असल्यामुळे हे सर्वजण पहिल्यांदा त्या व्यापारी मित्राकडे गेले. 

त्यानेही मदत करत त्यांच्या सोबत दुभाषा म्हणून पाठवला आणि अखेर तीन दिवसांच्या प्रवासानंतर हे सर्व तरून तामिळनाडू राज्यातील मुक्कुडी या के पलानी मुरगन याच्या गावी पोहोचले.

महेश सोबत गेलेल्या त्या दुभाषकाने तेथील सरपंचाना त्या मुलाविषयी सांगितले असता सरपंचाचे उत्तर ऐकून यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सरपंचाने सांगितले कि त्या नावाच्या तरुणाचा दहा ते बारा वर्षांपूर्वीच बेपत्ता झाला आहे.  

एक - दोन वर्ष शोधाशोध केल्यानंतर त्याच्या घरच्यांनी ही तो मृत्यू पावला, असे समजून त्याचे नंतरचे सर्व विधी पार पाडले होते. यालाही आपले घर कुठे आहे काही आठवत नव्हते. शेवटी गावात एका घरासमोर गेल्यानंतर त्याच्या आईने त्याला ओळखले व ज्याला मृत समजत होतो तो पोटचा मुलगा समोर पाहून आईने एकच हंबरडा फोडला. हे दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण मुक्कुडी गाव जमा झाले होते. 

त्या गावासाठी हे सर्वजण देवदूत होते. सर्वजण भरल्या डोळ्यांनी हात जोडून या तरुणांचे आभार मानत होते. हे सर्व पाहून हे तरुणही भारावून गेले तेथील लोकांनी वर्गणी करून महेश व त्याच्या मित्रांना खर्च देवू केला पण त्यांनी तो नम्रपणे नाकारून नाकारले.  तामिळनाडू मध्ये देखील मराठी माणसावर स्तुतिसुमने उधळली गेली.

श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी या छोट्याशा खेडेगावातील तरूणांची अज्ञात व्यक्तिला वाचवण्यासाठीची धडपड माणुसकी अजूनही जिवंत आहे हेच सर्वांना दाखवते त्यांचे हे कार्य निश्चितच सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. 

या तरुणांनाच्या घरच्यांशी बोलले असता त्यांचे कुटुंबीय बाबासाहेब बारगुजे, बाळासाहेब बारगुजे, एकनाथ बारगुजे यांनी आम्ही केलेल्या संस्काराचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post