पुणे : कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम नागरिकांनी पाळले पाहिजेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मास्क न वापरणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
या बैठकीस विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, आमदार दिलीप मोहिते, ॲड. अशोक पवार, सुनील शेळके, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, राहूल कुल, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, जिल्ह्याने कोविड लसीकरणाचा एक कोटी डोसेसचा टप्पा पूर्ण केला आहे. 83 टक्के लोकांनी पहिला डोस व 44 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. पुणे ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित रक्तदान शिबिरात 1440 पिशव्या रक्त संकलन होणे ही समाधानाची बाब आहे. अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.
दोन डोस मधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येईल. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना खेळाडूंप्रमाणे जलतरण तलावात सराव करण्यास अनुमती असेल, असेही ते म्हणाले.
प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी चांगले काम केले असल्याचे खासदार बापट यांनी सांगितले. पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी कोविड टास्क फोर्सचे सदस्य आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक पूर्वतयारीविषयी आणि कोरोना परिस्थितीविषयी माहिती दिली.
पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील, यशदा उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, विशेष पोलीस महानिरिक्षक, कोल्हापूरचे मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment