अमर छत्तीसे
श्रीगोंदा : राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार (ता. 29)पासूनच्या मध्यरात्रीपासून संघटना विरहीत बेमुदत कामबंद आंदोलन व उपोषण करणार आहेत.
महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळ कर्मचारी संघटनांनी जे आंदोलन केले होते. त्यात जो काही निर्णय झाला. तो सर्व कामगारांना अमान्य आहे. त्यांची प्रमुख मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण करण्याची आहे.
परंतु त्याविषयी कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून संघटना विरहीत बेमुदत कामबंद आंदोलन व उपोषण करणार आहेत. त्यांच्या आंदोलनाला श्रीगोंदा भाजपातर्फे पाठिंबा देण्यात आला.
यावेळी आ. बबनराव पाचपुते म्हणाले कि, एस.टी कर्मचाऱ्यांच्या दररोजच्या आत्महत्येच्या बातम्या वाचून मनाला अत्यंत वेदना होत आहेत. राज्य परिवहन कर्मचारी सुद्धा माणसेच आहेत. परंतु या निगरगट्ट व अकार्यक्षम सरकारला सर्वसामान्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.
संपूर्ण महाआघाडी सरकार आर्यन खानला वाचवण्याच्या कामात गुंतले आहे. सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा गांभिर्याने विचार न केल्यास भाजपाच्या वतीने सरकारला जाग आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन उभे केले जाईल.
यावेळी श्रीगोंदा भाजपातर्फे तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, शहराध्यक्ष राजेंद्र उकांडे, यांनी आंदोलनास पाठिंबा देत असल्याचे पत्र वाहतुक अधिक्षक स्वप्निल आहेर यांच्याकडे दिले, यावेळी विनय महाजन,संदिप बोळगे, विशाल जोगदंड, दिलीप बोके, सुहास काळे, निलेश आखाडे, दादासाहेब सांगळे, गजराज कोतकर, पोपट पांढरे, निलेश गोरे, अनिल बोरावके,अशोक घोडके, योगेश शेटे यांसह मोठ्या प्रमाणावर राज्य परिवहन कर्मचारी उपस्थित होते.
Post a Comment