विकास मंडळाच्या वार्षिक सभेबाबत सभासदांना अंधारात ठेवण्याचा डाव

नगर :  जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी होत आहे. या सभेबाबतची माहिती सभासदांना 16 डिसेंबरला व्हाट्सअप च्या माध्यमातून कळविण्यात आली. त्यावेळेस सभासदांना विकास मंडळाच्या कारभाराबाबत प्रश्न विचारण्याची मुदत ही 14 डिसेंबर असल्याचे समजल्याने सभासदांना विकास मंडळाच्या कारभाराबाबत कोणताही आक्षेप घेण्याची संधी जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांनी सभासदांना दिली नसल्याचा आरोप गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी केला आहे.


विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विकास मंडळाचा जुनाच अहवाल जुने फोटो टाकून आपली प्रसिद्धीची भूक भागवण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वसाधारण सभेची तारीख ठरल्यानंतर सभासदांना सात दिवस आधी अहवाल मिळणे अपेक्षित असते. 

सभासद अहवालावर अभ्यास करून आपल्या हरकती अथवा प्रश्न विचारण्याची सभासदांना संधी असते. मात्र मुद्दामहून सभासदांना अंधारात ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा कुटील डाव असल्यामुळे ही सर्वसाधारण सभा कायदेशीर होईल आहे, का ? स्वच्छ कारभाराचा आव आणणार्यानी सभासदांना सभेबाबत का लपून ठेवले, असाही प्रश्न निर्माण होतो.

विकास मंडळाच्या या अहवालामध्ये जुनी माहिती देत असताना विकास मंडळाच्या बांधकामावर आत्तापर्यंत किती पैसे खर्च झाले किती देणग्या गोळा झालेल्या किती पैसे देणे आहे.

ही आकडेवारी सत्ताधाऱ्यांनी खुबीने लपवली आहे आत्तापर्यंत झालेल्या या सर्व व्यवहाराची माहिती तसेच बिल्डरशी झालेल्या कराराची माहिती आवाजात का दिली नाही असा प्रश्न उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष विठ्ठल राव फुंदे यांनी उपस्थित केला आहे.

अहवालात जुन्याच उद्घाटनाचे फोटो टाकून,जुन्या बांधकामाचे मंजुऱ्या, प्लॅन इस्टिमेट, फोटो टाकून सभासदांची दिशाभूल केली जात आहे. शिक्षक बँकेची निवडणूक घेण्याची मागणी करणाऱ्या विकास मंडळाच्या सत्ताधाऱ्यांनी विकास मंडळाची निवडणूक का घेतली नाही? असा सवाल गुरुमाऊली मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी केला आहे.

शिक्षक बँकेची निवडणूक प्रक्रिया ही सहकार खात्याच्या, शासनाच्या आधीन आहे. मात्र विकास मंडळ हे स्वायत्त धर्मादाय संस्था असल्यामुळे त्यांना निवडणूक घेण्याचा आधिकार आहे. मुदत संपल्यानंतर स्वाभीमानाने सत्ताधार्‍यांनी निवडणुकीला सामोरे जायला हवे होते, 

मात्र आपलं ठेवायचं झाकून या उक्तीप्रमाणे सत्ताधारी वागत आहे. तसेच  शिक्षक बँकेतून सत्ता गेल्यानंतर सत्तेची हाव असणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याने विकास मंडळात आपली विश्वस्त म्हणून वर्णी लावून घेतली. आपण सत्तेचे किती लालची आहोत, हे सभासदांना दाखवून दिले. असा आरोप श्री गोकुळ कळमकर यांनी केला आहे.

शिक्षक बँकेची सत्ता आता ताब्यात आहे. बँकेने विकास मंडळाला ठेवी देण्याबाबतचा ठराव, करार करून घेतला आहे. मग आपल्याकडे कोटीच्या कोटी रुपयांची संमती पत्र आहेत, असे आपण लोकांना सांगत होता. मग ही संमती पत्र आता गेली कुठे ?का विकास मंडळाला ठेवी मिळत नाही, याचे आत्मपरीक्षण सत्ताधार्‍यांनी करावे, कायम आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडायचं, ही या तथाकथित नेत्यांची सवय असल्याचे मंडळाचे दक्षिण जिल्हा प्रमुख विजय नरवडे यांनी म्हटले आहे. 

लोकांचा विकास मंडळाच्या बांधकामावरचा विश्वास उडाला आहे. लोकांकडे गेल्यानंतर लोक पाठ फिरवित आहेत, नकार देत आहेत, हे वास्तव आहे. सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेणे अपेक्षित होतं, मात्र मीच मोठा, मीपणा मुळेच विकास मंडळाचे बांधकाम रखडले असल्याचा आरोप विजय ठाणगे यांनी केला आहे.

विकास मंडळामार्फत बांधले जाणारे व्यापारी संकुल आता कालबाह्य ठरले आहेत नाट्य संकुलात माणसे जमा होण्याचे दिवस आता गेले आहेत कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर या सर्व बाबींमध्ये बदल करून विकास मंडळाच्या या वास्तूमध्ये भव्य असे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल होणे आवश्यक आहे.विकास मंडळाच्या या इमारतीचा जिल्ह्यातील शिक्षकांना कोणताही फायदा नाही ठराविक तालुक्यातील लोकांच्या सोयीसाठी विकास मंडळाचे संकुल उभारणीचा हट्ट धरला जात आहे .विकास मंडळाची जागा विकून त्याच्या सर्व तालुक्यात शाखा निर्माण करणे आवश्यक आहे. - सलीमखान पठाण, माजी चेअरमन, शिक्षक बँक

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post