पारनेर : पारनेर तालुक्यात पाण्याअभावी शेतीपिके जळाल्यावर व पिण्याच्या पाण्यासाठी जनावरे दगावल्यावर आम्हाला पाणी देणार का? असा संतप्त सवाल करीत पारनेर तालुक्यातील शेतकर्यांनी आम्हाला तातडीने कुकडी व पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे.
कुकडी कालवा सल्लागार समितीकडून कुकडी व पिंपळगाव जोगा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. मात्र पंचवीस मे नंतर पाणी सोडणार असेल तर आमची शेतीपिके उध्वस्त होतील त्यामुळे तातडीने पाणी सोडा यासाठी आता पारनेर तालुक्यातील सामाजिक संघटनांनी रास्ता रोकोचा इशाराही दिला आहे.
पंधरा दिवसांपासून पारनेर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागल्याने कुकडीतून उन्हाळी आवर्तन सोडा, अशी मागणी होत आहे. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडीतून २५ मार्च तर पिंपळगाव जोगा धरणातून आठ एप्रिलला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
मात्र एवढ्या उशिरा आवर्तन सोडले तर उभी शेतीपिके उध्वस्त होतील. तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर तालुक्यातील शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.
तसेच कुकडीतून तातडीने पाणी सोडले नाही तर नगर पुणे राज्य महामार्गावर रास्ता रोकोचा इशाराही दिला. भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष विश्वनाथ कोरडे, अॅड बाळासाहेब लामखडे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश ढवण आदींनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
दरम्यान निघोजचे माजी सरपंच चंद्रकांत लामखडे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आमदार निलेश लंके यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकर्यांना ज्ञाय द्यावा असे साकडे घातले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून पारनेर तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती बाबत सकारात्मक निर्णय घेतला, जाईल असे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.
Post a Comment