मुंबई : नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतो, हे आज दिसल्याचे सांगत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अँड. गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने सिल्व्हर ओकवर आंदोलन केल्यानंतर त्यांनी ही पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुढे म्हणाले की, एसटी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचा गेली 50 वर्षे घनिष्ठ संबंध आहे.
त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून सुटलेले नाहीत. याच वेळेला काही चुकीचा रस्ता दाखवला आणि कारण नसताना घरदार सोडून एसटी कर्मचारी बाहेर राहीला. त्यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करायची वेळ आली. या संपाचे नेतृत्व ज्यांनी केलं ते यासाठी जबाबदार आहेत.
पवार म्हणाले, आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कर्मचाऱ्यांना जर चुकीचा रस्ता कोणी दाखवत असेल तर त्याला विरोध करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे असे ते म्हणाले.
नेता जर शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर कसा दुष्परिणाम होतोय हे आज दिसलं. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मतभेद असतात, संघर्ष असतात त्यावर टोकाची भूमिका कधीही न घेण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. पण गेले काही दिवस एसटी कर्मचाऱ्यांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला जात होता तो अशोभनीय आहे, असे ते म्हणाले.

Post a Comment