सेंट्स किट्स : अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसऱ्या टी-ट्वेण्टी सामन्यात वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात भारताच्या आवेश खानने टाकलेला पहिलाच चेंडू नो बॉल ठरला आणि तिथेच सामना भारताच्या हातून निसटला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतरावर फलंदाज बाद होत गेले. भारतीय संघाला २० षटकांमध्ये केवळ १३८ धावाच करता आल्या.
भारताकडून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. त्यापाठोपाठ रविंद्र जडेजा २७ व ऋषभ पंतने २४ धावा करत वेस्ट इंडिजसमोर सन्मानजनक आव्हान उभे केले.
भारताने दिलेल्या आव्हानाला पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्ये तुफान फटकेबाजी करत पहिल्या ६ षटकांमध्ये ४६ धावा ठोकल्या. त्यानंतर भारताने विंडीजच्या संघाला पहिला धक्का दिला.
पॉवर प्लेनंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड निर्माण करत वेस्ट इंडिजच्या धावसंख्येला ब्रेक लावला. अखेरच्या षटकात वेस्ट इंडिजला विजयासाठी १० धावांची आवश्यकता होती. मात्र भारताच्या आवेश खानकडून पहिल्याच चेंडूवर चूक झाली.
हा चेंडू नो बॉल ठरला. त्यानंतर मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत विंडीजच्या डेवोन थॉमसने षटकार खेचला आणि दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारत विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या विजयासह विंडीजच्या संघाने पाच टी-ट्वेण्टी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबर केली आहे.
Post a Comment