नेवासा : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट )संगमनेर यांचे मार्फत महिन्यातील चौथ्या शनिवारी शालेय कामकाज झाल्यानंतर दिवसभर शिक्षण परिषदेचे केलेल्या प्रशिक्षणावर अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या समन्वय समितीने घेतलेल्या बहिष्काराला सकारात्मक प्रतिसाद देत नेवासा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आज झालेला शिक्षण परिषदेकडे पाठ फिरवली.
राज्यातील इतर जिल्हा परिषदेमध्ये शनिवार वगळून इतर शालेय कामकाजाच्या वेळात शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते, असे असतानाही यापूर्वी बऱ्याचदा प्राथमिक शिक्षक संघटनांनी शिक्षणाधिकारी व प्राचार्य डायट यांना वारंवार विनंती करूनही यामध्ये कोणताही बदल न झाल्याने, अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने आज या शिक्षण परिषदेवर बहिष्कार घालण्याचे ठरवले,
त्यानुसार नेवासा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटना यांच्या प्रतिनिधींनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत नेवासा तालुक्यात आज झालेल्या शिक्षण परिषदेला एकही शिक्षक उपस्थित राहिले नाहीत, सुरुवातीला या संदर्भात तालुका समन्वय समितीने गटशिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे यांना निवेदन देऊन या बहिष्कार बाबत अवगत केले.
याबाबत आपल्या भावना वरिष्ठ कार्यालयाला कळवल्या जातील असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी पटारे यांनी समन्वय समितीतीला दिले. राज्यातील इतर जिल्हा परिषदेमध्ये होणारी शिक्षण परिषद ही शालेय वेळामध्ये घेतली जात आहे असे असताना, जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत शाळा व शिक्षण परिषद मानवी दृष्टिकोनातून चुकीचे आहे ,अशी संतप्त भावना समन्वय समितीने व्यक्त केली.
यापुढे शिक्षण परिषदा ह्या शनिवार वगळून इतर शालेय कामकाजाच्या वेळेतच घेण्यात याव्यात याबाबत वरिष्ठ कार्यालयांना विनंती करूनही नियोजनात काहीही बदल न झाल्याने बहिष्कार टाकावा लागला अशी भूमिका समन्वय समितीने मांडली.
यावेळी हरिभाऊ जाधव, रवींद्र कडू पाटील, राजेंद्र मुंगसे, भास्कर नरसाळे प्रदीप चक्रनारायण, संदीप जंगले, राजाभाऊ बेहेळे, दशरथ ढोले ,बथूवेल हिवाळे , सुखदेव आरोळे , संजय लाड, शकील शेख,अविनाश भालेराव, प्रकाश मुरकुटे , शिवाजी घुले, जमीर शेख, आसाराम कदम, उस्ताद शेख, जावेद शेख,आदी समन्वय समिती प्रतिनिधी उपस्थित होते.
शिक्षण परिषदेची वेळ ही विशेषतः महिला भगिनींसाठी गैरसोयीची असून प्रशिक्षण घेण्यासाठी कोणाचाही नकार नाही ,परंतु शालेय कामकाजाच्या वेळेतच यापुढील प्रशिक्षणाचे आयोजन डायट व जिल्हा परिषद यांनी करावे. यापुढेही शिक्षण परिषदेच्या नियोजनात बदल न झाल्यास यापुढेही आंदोलन चालूच ठेवण्यात येईल. - भास्कर नरसाळे, सदस्य, समन्वय समिती
Post a Comment