नगर : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाल्याने ही कामे तातडीने सुरू करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी आज बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला काँग्रेस, शिवसेना, आप, वंचित बहुजन आघाडी यासह विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्याने गुरुवारपासून गावोगाव चक्काजाम आंदोलन करण्याचा, आंदोलनात महिलांना सहभागी करुन घेण्याचा इशारा आमदार लंके यांनी आज सायंकाळी आंदोलनस्थळी बोलताना दिला.
नगर-पाथर्डी-नांदेड निर्मल महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१), नगर-राहुरी-शिर्डी-कोपरगाव रस्ता (राष्ट्रीय महामार्ग १६०) व नगर-मिरजगाव-चापडगाव-करमाळा- टेंभुर्णी (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१) या महामार्गांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे.
अपघातामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. परिसरातील गावे धुळीने त्रस्त झाली आहेत. नागरिकांना दळणवळणासाठी अडचणी येत आहेत, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नाही, यासाठी ३८ पत्रे प्रशासनाला दिली.
त्यामुळे या तिन्ही रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी करत आमदार लंके यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उपोषणात पारनेर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी परिसरातील नागरिक, संघटना पदाधिकारी सहभागी झाले आहेत. माजी ऊर्जा राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, घनश्याम शेलार, डॉ. क्षितीज घुले, शिवशंकर राजळे, रफिक शेख, किरण काळे, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, गोरख दळवी, गिरीश जाधव, बाळासाहेब हराळ आदी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत उपोषणात सहभाग नोंदवला.
आमदार लंके म्हणाले की, प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे उद्यापासून वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे. दबावतंत्र निर्माण करावे लागणार आहे. गावोगाव चक्काजाम आंदोलन सुरू करावा लागणार आहे. यासाठी महिलांचा सहभाग घ्यावा लागणार आहे.
आपली दिशाभूल करण्यासाठी तात्पुरते जेसीबी, डंपर आणून टाकले जात आहेत. त्यामुळे प्रशासनाला गांभीर्य नाही असेच दिसत आहे. त्यामुळे उद्यापासून वेगळी भूमिका घ्यावी लागणार आहे.
Post a Comment