पाथर्डी : थकबाकीच्या नावाखाली शेतकर्यांकडून शेतीपंपाच्या वीज बिलापोटी जुलमी वसुली करून शेतीपंपाचा वीज पुरवठा बंद करण्यात आल्याने आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मिरी विद्युत उपकेंद्र येथे धरणे आंदोलन सुरू होते.
अधिकारी सांगूनही वेळेत न पोहचल्याने संतप्त शेतकर्यांनी सबस्टेशनमधील अधिकार्याची खुर्ची पेटून खुर्ची टेबलची देखील तोडफोड करण्यात आली.
यावेळी पं स सदस्य राहुल गवळी, युवानेते अमोल वाघ, अंबादास डमाळे, संतोष गरुड, राजेंद्र म्हस्के, रवींद्र मुळे, अजय पाठक, उद्धव दूसंग, शिवाजी मचे, दिलीप वांढेकर, भीमराज सोनवणे, जालिंदर वामन, सरपंच सुधाकर वांढेकर, भागिनाथ गवळी, नागेश आव्हाड, सचिन होंडे, माणिक लोंढे, जालिंदर गवळी, अशोक गवळी, आबासाहेब गवळी, मच्छिंद्र दारकुंडे, रामदास गोरे, पोपटराव आव्हाड, कुंडलिक मचे, रामदास बुटे, रामेश्वर फसले, भाऊसाहेब बर्फे, सतीश क्षेत्रे, आबासाहेब अकोलकर, सुनील कराळे यांच्यासह 39 गावातील शेतकरी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
महावितरणच्या अधिकार्यांसह राज्य सरकारचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. थकबाकीचे कारण पुढे करत महावितरण कडून शेतीपंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. या जुलमी वसुलीच्या निषेधार्थ माजी ऊर्जामंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिंदे फडणवीस सरकारच्या भूमिकेविरोधात बुधवारी मिरी सबस्टेशन समोर धरणे आंदोलन सुरू केले.
सकाळी नऊ वाजता आमदार तनपुरे शेतकर्यांसोबत आंदोलनास बसले. त्यानंतर अर्धा पाऊण तास उशिराने महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचल्याने आमदार तनपुरे यांच्यासह उपस्थित शेतकर्यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली.
दोन तासानंतरही पाथर्डी आणि नगरचे महावितरणचे अधिकारी शेतकर्यांच्या भावना समजून घेण्यासाठी येत नाहीत म्हणून काही संतप्त शेतकर्यांनी मिरी सब स्टेशनच्या अधिकार्याची खुर्ची जाळून टाकली तर काहींंनी कार्यालयातील टेबल खुर्च्याची तोडफोड केल्याने या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले.
यावेळी आमदार तनपुरे यांनी शेतकर्यांना व कार्यकर्त्यांना शांत करत राज्यात आपले सरकार नसले अथवा मी जरी मंत्री नसलो तरी मतदारसंघातील शेतकर्यांवर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले.
Post a Comment