पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार होऊ घातलेल्या ‘मंदौस’ चक्रीवादळामुळे
पुण्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. शनिवार (ता. दहा) नंतर तुरळक ठिकाणी
हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात थंडी गायब
होत आहे. किमान तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील किमान सरासरी तापमानातही सामान्य तापमानापेक्षा दोन ते तीन अंशांनी जास्त होते. पुढील दोन दिवस सकाळी व संध्याकाळी धुके आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा वाढू लागला आहे.
राजस्थानातील चूरू येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्याप्रमाणे राज्यातही थंडी नाहीशी झाली आहे. दिवसा ढगाळ हवामानासह उकाडा चांगलाच वाढू लागला आहे. बुधवारी गडचिरोली येथे राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३५.५ अंश
तापमान नोंदले गेले. आगामी काळात पुण्यासह परिसरात पावसाची शक्यता
असल्यामुळे राज्यात इतर ठिकाणी पाऊस होईल, का अशी चर्चा सध्या राज्यात सुरु
झालेली आहे.
Post a Comment