शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर २००९ मध्ये मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी केली होती. मात्र, माझा पराभव झाला. मी शिर्डी लोकसभा लढवावी, अशी देशातील नागरिकांची इच्छा आहे.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे माझे चांगले मित्र असल्याने राज्यसभेची माझी उरलेली दोन वर्षे लोखंडे यांना द्यावीत व मला शिर्डी लोकसभा मतदारसंघात संधी द्यावी, असा प्रस्ताव आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीसमोर ठेवला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंगळवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
आठवले यांनी महायुतीसमोर हा नवीन फॉर्म्युला ठेवला. या वेळी जिल्हा आरपीआयचे नेते बाळासाहेब गायकवाड, नितीन कापसे, पप्पू बनसोडे, कैलास शेजवळ आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की जागा वाटपावरून जास्त ताणाताण करून चालणार नाही. भाजप कोणाचा पक्ष संपवायला निघालाय असे अजिबात नाही. आणि संपवण्याचा प्रयत्न केला, तरी पक्ष संपत नसतो. माझ्या पक्षाचे लोक निवडून नसले आले, तरी माझा पक्ष काही संपला नाही. मला शिर्डीमध्ये संधी मिळाली, तर या भागाचा विकास करण्यासाठी मला चांगली संधी उपलब्ध होईल.
सर्व समाज आपलाच असून, समाजातील सर्वच माझे मित्र आहेत. मी सुरुवातीला हरलो. त्यानंतर बौद्ध समाजाला संधी अजून मिळाली नाही. या मतदारसंघात बौद्ध समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सन २००९ नंतर या मतदारसंघात बौद्ध समाजाला संधी मिळाली नाही.
अनुसूचित जातीत बौद्ध समाजाची संख्या जास्त असल्याने उमेदवारीसंदर्भात बौद्ध बांधवांच्या अपेक्षा असतील, तर भाजपने त्याकडे लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले, तर वेल अँड गुड; परंतु ते येणार नाहीत. ना ते महाविकास आघाडीत जाणार. स्वतंत्र निवडणूक लढवण्याची त्यांची अनेक वर्षांची भूमिका आहे. सर्व ४८ जागा ते लढतील अशी मला अपेक्षा आहे.
ते बाबासाहेबांचे नातू असून, महाविकास आघाडी त्यांचा अपमान करीत आहे. माझा कोणी अपमान करत नाही. मी राज्यमंत्री आहे. माझ्या पक्षाचे खासदार नसताना मला मंत्रिपदाची संधी दिली आहे. माझा अपमान कोणी करू शकत नाही आणि मी कोणाचा करत नाही.
Post a Comment