मुंबई : गेल्या काही दिवसापासून कांद्याच्या दरात चांगलीच वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही कांद्याने आपला भाव कायम ठेवली होती. कांद्याचे दर हे 5000 ते 6000 प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले होते. मात्र, सध्या दरात घसरण होत आहे.
सरकारी यंत्रणांमार्फत कांद्याची खुलेआम विक्री होत असली तरी त्याचा पुरवठा पुरेसा होत नाही. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या महिनाभरापासून सातत्याने किरकोळ दर 60 ते 80 रुपये प्रतिकिलो होते. मात्र, सध्या कांदा 2000 प्रतिक्विंटल ते 2500 रुपयांच्या आसपास विकत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
देशांतर्गत बाजारात अचानक कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. या वाढलेल्या आवकेमुळं कांद्याच्या दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. तसेच दुसरा मुद्दा म्हणजे कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले 20 टक्क्यांचे निर्यात शुल्क याचा देखील परिणाम कांद्याच्या दरावर झाल्याचं बोलले जात आहे.
निर्यात शुल्कामुळे कांदा बाहेरच्या ठिकाणी निर्यात करणं अडचणीचं होत आहे. त्यामुळं लवकरात लवकर कांद्यावर लावण्यातच आलेलं निर्यात शुल्क हटवण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना करत आहेत.
नांदगाव, मनमाड, येवला आदी बाजार समित्यांमध्येही कांदा दरात घसरण सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील 15 दिवसात 1 हजार 6 ते 2 हजार रुपयांनी कांद्याच्या दरात घसरण झाली आहे.
यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक व कांदा निर्यातीत येणारे अडथळे यामुळे कांद्याचे भाव घसरले आहेत. कांदा निर्यातशुल्क तातडीने मागे घ्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Post a Comment