समनापूरमध्ये होळकर यांचे स्मारक उभारा..

संगमनेर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जात आहेत. संगमनेर तालुक्यातील विविध गावांशी त्यांचा त्या काळात मोठा संबंध आला असून त्यांच्या कार्याची ओळख पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणादायी राहावी याकरता समनापुर येथे त्यांचे भव्य स्मारकासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.


नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा सततच्या विकास कामातून वैभवशाली बनवला आहे. 

या तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा असून तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळख असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संगमनेर तालुक्यातील अनेक गावांशी त्या काळात संबंध आला आहे. 

समनापुर या ठिकाणी त्यांच्या काळातील ऐतिहासिक बाराव असून ही बारवाची जागा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मी सातत्याने पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या नावे करून घेतली आहे.

त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी बारव निर्माण केल्या आहेत. आजही त्या बारव सुस्थितीत असून आजच्या पिढीला त्यांच्या महान कार्याची ओळख करून देण्यासाठी आणि या ऐतिहासिक ठिकाणांचे  संवर्धन व जतन करण्यासाठी  समनापुर या गावांमध्ये त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी सर्वांची मागणी आहे.

समनापुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक होण्यासाठी विशेष बाब म्हणून जिल्हा नियोजन अथवा कोणत्याही उचित निधीतून एक कोटी रुपयांचा निधी प्रस्थापित करावा व तातडीने हे भव्य स्मारक निर्माण करावी अशी आग्रही मागणी सत्यजित तांबे यांनी केली आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचे समनापुर मध्ये स्मारक होण्यासाठी केलेल्या मागणीचे समनापुर ग्रामस्थ व तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post