बीड : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी पॉलिटिकल आहे. वाल्मिक कराड याच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते, ही गोष्ट खरी आहे. पण खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध दिसत नाही. परंतु नैतिकतेच्या आधारे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर ठीक आहे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर बीडसह राज्यभरात वातावरण चांगले तापलेले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा मिळावी यासाठी ठिक-ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत.
आज मुंबईमध्ये आक्रेश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली, कुटुंबासोबत चर्चा केली. या भेटीनंतर आठवले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आठवले म्हणाले की, वाल्मिक कराड याच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते, ही गोष्ट खरी आहे. पण खंडणी आणि हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा संबंध दिसत नाही. परंतु नैतिकतेच्या आधारे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला तर ठीक आहे.
पण मला असं वाटतं राजीनाम्याची मागणी ही पॉलिटिकल आहे. या संदर्भात काय करायचं हा निर्णय अजित पवार आणि धनंजय मुंडे घेतील असे आठवले यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षेच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे मोर्चा होता. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांचे कुटुंब मुंबईमध्ये आले होते. त्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली.
या केसमध्ये जवळजवळ सगळे आरोपी पकडण्यात आले आहेत. आंधळे नावाचा आरोपी अजून फरार आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा अशी मागणी होती, त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. त्याच्यावर 302 लावावे, अशी मागणी देखील आहे.
Post a Comment