कोणाचेही लाड करू नका...

इंदापूर ः  पोलिसांनी मोठ्या शाळेत शिकणारी मुले काही ना काही चुकीचे करतात, मी त्या शिक्षण संस्थेचे नाव घेत नाही. एकमेकांकडे का बघितले म्हणून भांडणे होतात कोयत्याने देखील वार केले जातात, हे प्रकार थांबले पाहिजेत. मी पोलिसांना सांगितले आहे, की अशा प्रकरणात कोणाचेही लाड करू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.


इंदापुरातील सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवात 
बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच सोशल मीडियाच्या होणाऱ्या चुकीच्या वापराबद्दल देखील चांगलेच कान टोचले आहेत.

पवार म्हणाले, बारामतीत एका शाळेत एकमेकांकडे पाहाण्यावरून मुलांनी मारामारी केली, कितीही मोठ्या बापाचा मुलगा असला तरीही कायदा त्याला दाखवा. लीस खात्याने शक्ती अभियान सुरू केले आहे. खऱ्या अर्थाने कोण चुकत असेल तर तो कितीही मोठ्या बापाचा पोरगा असेल, पोरगी असेल तर हयगय करू नका सगळ्यांना कायदा नियम सारखा आहे, असे ते म्हणाले.

पवार म्हणाले, शक्ती अभियानाच्या माध्यमातून आम्ही यावर लक्ष केंद्रित केलं आहे. शक्ती अभियानाच्या संपर्क नंबर वर कोणीही गंमत म्हणून फोन करू नका. आम्हाला जर कळलं की गंमत म्हणून फोन केला तर त्याची अशी गंमत करीन की त्याच्या दहा पिढ्या आठवणीत राहील, असे ते म्हणाले. 

पवार म्हणाले,  काही मुलांनी नो कॉम्प्रोमाइज ग्रुप अशा पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप  आणि इन्स्टाग्राम ग्रुप तयार केले आहेत, ते लगेच बंद करा. मुलांनो जर तुम्ही चुकीच्या रस्त्यानं गेलात तर अलिकडे काहीही शोधता येते. त्यामुळे अशा गोष्टींना अजिबात थारा देऊ नका.  लहान वयात कधीकधी मुला मुलींचा पाय घसरतो कृपा करून आपण आपल्या आई-वडिलांना कमीपणा वाटेल असे कृत्य करू नका. तुमच्यावर राज्याचे, देशाचे भवितव्य अवलंबून आहे.  तुम्ही उद्या देशाचे जबाबदार नागरिक बनणार आहात. तुम्हाला देशाला पुढे न्यायचं आहे, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post