अहिल्यानगर : कर्जत नगरपंचायतीच्या अकरा नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला आहे. तेव्हापासून तालुक्यात राजकीय घडामोडी घडत आहे. आगामी काळात आणखी राजकीय भूकंप होणार आहे. या वेळी आता या भूकंपाचे धक्के भाजपला बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून सर्व नगरसेवक सहलीला गेलेले आहेत. हा विश्वास ठराव दाखल करण्याअगोदर व नंतर सर्वच नगरसवकांनी आमदार राम शिंदे यांची भेट घेतलेली आहे. एक प्रकारे या नगरसेवकांनी भाजपबरोबर जाण्याचे संकेत दिलेले आहेत. यामुळे
कर्जतमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे. या भूकंपाचे धक्के आमदार रोहित पवार व त्यांच्या गटाला बसले आहेत. या भूकंपाचे धक्के रोहित पवार गट सहन करीत आहे.
परंतु हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये दाखल होत असल्याने भाजपमधील एक गट नाराज झाला आहे. या नगरसेवकांना आपल्यात घेऊन आपल्याच मानसांवर आपण अन्याय करणार आहोत. त्यामुळे या नगरसेवकांना घेऊ नये अशी अपेक्षा भाजपमधील काहीजण व्यक्त करीत आहे.
या नगरसेवकांना मागील तीन सव्वा तीन वर्षे विकास कामे करता आलेली नाही. आता आपल्या गटात घेऊन कामे करून हीच मंडळी पुन्हा निवडणुकीत तिकिटे मागणार आहेत. त्यामुळे भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून या लोकांना तिकिटे दिली जातील. त्यामुळे एक निष्ठांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये गटबाजी फोफावणार आहे.
तसेच ही मंडळी पुन्हा आपल्या गोटातून विरोधी गटात जाणार नाही याची कोण गरँटी घेणार असा सवाल भाजप कार्यकर्त्यांतून केला जात आहे. बाहेरील लोकांना पक्षात घेऊन त्यांचे पुर्नवसन करण्यापेक्षा पक्षातील लोकांना ताकद देणे महत्वाचे ठरणार आहे. पक्षातील लोकांना काटशहाच्या राजकारणात सतरंज्या उचलायला लावू नका असे कार्यकर्ते म्हणत आहेत.
या चर्चा आता सुरू झाल्याने कर्जत तालुक्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Post a Comment