पारनेर : गटबाजी थांबली नाही, तर तालुक्यातून राष्ट्रवादीचा शेवट होईल, असे वक्तव्य आमदार काशिनाथ दाते यांनी केले.
पारनेर येथे गौरव मंगल कलश रथयात्रेनिमित्त झालेल्या सभेला राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली. सभेला गर्दी न झाल्याने आमदार दाते यांनी तालुक्यातील गटबाजीबाबत भाष्य करत नाराजी व्यक्त केली. यामुळे पारनेर राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली असून, वरिष्ठ यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रथयात्रेनिमित्त पारनेर येथे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयत जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांची कमी संख्या पाहून आमदार दाते यांनी नाराजी व्यक्त करत माझ्याकडे कार्यालयात विकासकामे व इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
मात्र, रथयात्रेसाठी कार्यकर्त्यांची कमी संख्या उपस्थित राहणे ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी लांच्छनास्पद आहे, असे वक्तव्य केले.
विधानसभेसाठी पक्ष तालुक्यात उभा राहिला; परंतु पक्षातील भांडणे संपलेली नाहीत. तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये प्रचंड गटबाजी आहे. वरिष्ठ पातळीवर काड्या लावण्याची कामे केली जातात. तालुक्याच्या विकासासाठी झगडत आहे. तालुक्यातील पठार भागावर पाणी आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत आहे.
तालुक्यात आलेल्या रथयात्रेचे अशा पद्धतीने स्वागत होत असेल, तर हे तालुक्यात सहन करून घेतले जाणार नाही. विकासाची कामे पाहिजे ते मागून घ्या; पण गटबाजी कोणी करत असेल तर ते उचित नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
कार्यकर्ते नेते व्यासपीठावर येऊन बसतात. खाली कार्यकर्त्यांना येऊ नका म्हणून सांगतात ही पद्धत चुकीची आहे. मी गरीब आहे; पण स्वाभिमानी आहे. जनतेसाठी काम करत आहे.
प्रपंचासाठी काही काम करत नाही, तरीही माझ्याबाबत रथयात्रा येणार असल्याने जास्त प्रमाणात चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमांवर ट्रोल केले जात आहे हे विरोधकांकडून नाही तर पक्षांतर्गत होत आहे, असे म्हणत मंत्री झिरवळ यांच्यासमोर आ. दाते यांनी मनमोकळे केले.
कार्यक्रमाला उपस्थिती पाहून तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. रोज यापेक्षा दहापट संर कामे घेऊन कार्यकर्ते येत असतात. मग या कार्यक्रमाला नागरिक का येत नाहीत, कोण यांना येऊ नका म्हणून सांगते का, याचा सोक्षमोक्ष झाला पाहिजे, असे आ. दाते यांनी म्हटले.
Post a Comment