पाऊस विश्रांती घेणार...

मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आता कोकणपट्टीसह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी व्यापला आहे. मान्सूनने आठवडाभर राज्यभरात चांगलीच हजेरी लावली असून आता काहीशी उसंत घेतली आहे. 


मुंबईसह पुण्यात आता पुढील चार दिवस पावसाची ओढ कमी राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान केंद्राने दिला. कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भात आज पावसाचा जोर चांगला राहणार आहे. उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचंही हवामान विभागाने सांगितले.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. छत्तीसगड ओडिसा आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या मान्सून प्रवास करत आहे. 

येत्या तीन दिवसात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

29 मे ते दोन जून या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि कोकण व गोव्यात काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे. पण बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप असेल.

गुरुवारी (ता. 29) रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे . छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला, यवतमाळ, रायगड, पुणे व साताऱ्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

येत्या चार दिवसात कोकणपट्टी सह मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या अलर्ट आहेत. मात्र, दोन-तीन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात येत्या चार दिवसात पावसाचा जोर ओसरणार आहे .बुधवारपासून मुंबई आणि पालघर भागातील पावसाचा जोर कमी होईल.

कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये 31 मेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post