अखेर आशिष येरेकर यांची बदली...

अहिल्यानगर ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची  बदली झालेली आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

2018 चे आयएएस अधिकारी असणारे येरेकर हे 6 मे 2022 रोजी नगरला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदलून आले होते. त्यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प सहायक एकात्मिक आदिवासी या पदावर काम केलेले आहे. 

नगर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करतांना त्यांनी कमी कालावधीत प्रशासनावर पकड निर्माण केली होती. गेल्या दोन वर्षापेक्षा अधिक कालावधीत नगर जिल्हा परिषदेत काम करताना येरेकर यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या काळात जलजीवन ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी पाणी योजना राबवण्यात आली आहे. 

या जलजीवन योजनेच्या कामाबाबत अनेक तक्रारी झालेल्या आहेत. या तक्रारींची चौकशीची मागणी खासदार नीलेश लंके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी केलेली आहे.

या अगोदरही येरेकर यांची दोनदा बदली झालेली आहे. त्यांनी ते बदलीचे आदेश रद्द करून आणले होते. मात्र आता त्यांना हजर व्हावेच लागेल, अशीच चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे. येरेकर यांची अमरावतीला जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे. आता ते जिल्हाधिकारी पदाचा पदभार कधी घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बैठकांना अधिकाऱ्यांसह कर्मचारी कंटाळलेले होते. त्यामुळे रोजच अधिकारी व कर्मचार्यांना घरी जाण्यास उशीर होत होता. उशिरापर्यंत चाललणाऱ्या बैठकांना अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय त्रस्त झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात नेहमीच झडत होती.  त्यामुळे सीओंची बदली कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

शिक्षकांसाठी क्युआरकोड हजेरीचा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता. ज्यांनी हजेरी केली नाही. त्यांचे पगार रोखवण्याचा प्रयत्न येरेकर यांनी केला होता. यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या. जिल्हा परिषदेवर मोर्चाही काढण्याचा इशारा शिक्षकांच्या समन्वय समितीने इशारा दिला होता. या समन्वय समितीने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन याबाबत आपले मत मांडले होते. त्यानंतर क्यूआरकोड हजेरीचा मुद्दा मागे पडला होता. त्यामुळे येरेकर यांची बदली व्हावी, अशी अपेक्षा शिक्षकांचीही होती.

येरेकर यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात मदत गोळा झालेली आहे. मिशन आपुलकीला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांच्याच कार्यकाळात शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाचाही आलेख वाढलेला आहे.  त्यांच्या कार्यकाळात बेशिस्त पणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागली होती. त्यामुळे येरेकर यांच्या सारखे अधिकारी जिल्ह्यासाठी खूप फायद्याचे ठरणारे आहेत. त्यांच्या कार्यकाळात जी शिस्त जिल्हा परिषदेतील बेशिस्त वागणाऱ्यांना लागली होती. ती पुढे मोडली जाते की काय अशीच शंका आता जिल्हा परिषद कर्मचार्यांमधून व्यक्त केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post