अपघातात त्र्यंबकेश्वर दिंडीतील वारकऱ्याचा मृत्यू

अहिल्यानगर ः नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून नगरमार्गे पंढरपूरकडे चाललेल्या संत निवृत्ति महाराज पालखी व दिंडीमधील वारकर्‍याचा भरधाव वेगातील दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना नगर-सोलापूर महामार्गावर दहिगाव (ता. अहिल्यानगर) परिसरात मंगळवारी (ता. 24) रात्री साडेआठ ते पावाणे नऊच्या  सुमारास घडली.  


दत्तू किसन उगले (वय 65, रा. लोखंडेवाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे या मयत वारकर्‍याचे नाव आहे. दत्तू उगले हे त्यांच्या पत्नीसोबत या दिंडीत आलेले होते. दिंडीने नगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात मुक्काम केल्यानंतर ती 24 जून रोजी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. 

रात्री या दिंडीचा मुक्काम साकत (ता. अहिल्यानगर) या गावात होता. दिंडीतील सर्व वारकर्‍यांनी रात्री जेवण केल्यावर उगले पती पत्नी हे दहिगाव येथे परिचित व्यक्तीच्या घरी मुक्कामासाठी पायी चालले होते. दहिगावच्या राम मंदिरासमोर महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीस्वाराने उगले यांना जोराची धडक दिली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असलेले पोलिस पथक तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी व पथकाने अपघात करणार्‍या दुचाकीस्वाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सदर दुचाकीस्वार हा अपघात झाल्यावर तेथून लगेच पसार झाला होता. 

या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post