अहिल्यानगर ः नवीन शैैक्षणिक वर्षाला १६ जूनपासून सुरवात झाली. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस दडपणमुक्त व आनंददायी असावा, या उद्देशाने शहरासह ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळांमध्ये प्रवोशोत्सव साजरा करण्यात आला.
शाळेच्या प्रवेशद्वारात रांगोळ्या काढून, गोड पदार्थ, गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. हा प्रवेशोत्सव साजरा करत असताना काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन झालेले आहे. या उल्लंघनाकडे मात्र शिक्षण विभागाने दुर्लक्ष केलेले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवार (ता. १६) पासून झाली. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी व मुलांची उपस्थिती वाढविण्याकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यभर ‘शाळा प्रवेशोत्सव’ उपक्रम साजरा करण्यात आला.
या उपक्रमात जिल्ह्यातील सर्वच शाळा सहभागी झाल्या होत्या. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढत त्यांना शाळेत आणण्यात आले. अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी गोड जेवणाबरोबर पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आलेले आहे. हा उत्साह शिक्षकांसह विद्यार्थी व पालक, राजकीय नेत्यांमध्ये दिसून आला. या उत्साहाच्या भरात अनेकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना जिल्ह्यातील काही भागात घडलेल्या आहेत. त्यावरून पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रवेशोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांना वाजत-गाजत शाळेत आणण्यात आले. मात्र काही शिक्षक व राजकीय नेत्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेले आहे. विद्यार्थ्यांना टॅक्टर व जेसीबीत बसून आणअयात आलेले आहे. वाहतूक नियमानुसार असे कृत्य करणे बेकायदेशीर आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी येणाऱ्या मुलांवर वाहतूक नियम मोडण्याचे संस्कार काहींनी आपल्या कृतीतून घडविले आहे. उत्साहाच्या भरात आपण नियम तोड असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही की प्रसिध्दीच्या झोतासाठी त्यांनी हा प्रकार केला यावर सध्या चर्चेचे फड रंगत आहे.
झालेला प्रकार निदंयनीय आहे. असे असतानाही त्या नेत्यांसह शिक्षकांनी समाज माध्यमावर फोटो व व्हीडीओ व्हायरल करून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केलेला आहे. या प्रकरणी आता शिक्षण विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Post a Comment