ठेवीदारांना न्याय मिळायलाच हवा नीलेश लंके : सिस्पे घोटाळ्याच्या चौकशीचे स्वागत

अहिल्यानगर : सिस्पे (सिस्पे–इन्फिनिटी) घोटाळ्याच्या चौकशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे खासदार नीलेश लंके यांनी स्वागत करत, सर्वसामान्य ठेवीदारांना न्याय मिळायलाच हवा, अशी ठाम भूमिका मांडली. या निर्णयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.


खा. लंके म्हणाले,  की या घोटाळ्यात सर्वसामान्य नागरिकांचे कष्टाचे पैसे अडकले आहेत. अनेकांनी भविष्यातील सुरक्षिततेच्या आशेने गुंतवणूक केली होती; मात्र त्यांना मोठ्या आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले. काही दुर्दैवी ठेवीदारांनी आत्महत्येपर्यंतचा टोकाचा निर्णय घेतला असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी होणे आवश्यक आहे.

“ज्यांनी हा घोटाळा केला आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. दोषींना अटक करून त्यांच्या मालमत्तेतून ठेवीदारांचे पैसे वसूल करून ते नागरिकांना परत मिळाले पाहिजेत,” अशी ठाम मागणी खा. लंके यांनी केली. सिस्पे घोटाळा उघडकीस आल्यानंतर आपण ठेवीदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. हा विषय राजकीय न करता केवळ ठेवीदारांच्या हिताचा विचार करणे हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडून आपल्यावर राजकीय आकसापोटी बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा आरोप करत, खा. लंके यांनी विखे पिता–पुत्रांवर अप्रत्यक्ष टीका केली. “स्वतःचे झाकायचे आणि दुसऱ्यांचे उघडे करायचे, हीच त्यांची जुनी सवय आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

सिस्पे प्रकरण गंभीर असताना, केंद्रीय मंत्री लोणी किंवा कोपरगावच्या दौऱ्यावर येतात, तेव्हा त्यांना या घोटाळ्याच्या चौकशीसाठी निवेदन का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्याऐवजी काहीजण पालकमंत्र्यांच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नगर जिल्ह्यातील मतदार सुज्ञ असून भाजपची खेळी त्यांनी ओळखली असल्याचे लंके यांनी सांगितले. नगरमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्ते घोटाळ्यावर मौन बाळगल्याची टीकाही त्यांनी केली.

जिल्ह्यात दहा लाखांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या ऑनलाईन फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यांचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी खा. लंके यांनी केली. ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीकडून शिर्डीसह इतर जिल्ह्यांत सुमारे ३०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करत, तसेच शेवगाव येथील शेअर मार्केट गैरव्यवहाराची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी सिस्पे घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे देण्याची घोषणा केल्यानंतर प्रतिक्रिया देताना खा. लंके म्हणाले, “जर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाच राज्य पोलिसांवर विश्वास नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा?” श्रीरामपूर व शिर्डी येथील गोळीबाराच्या घटनांचीही सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे हे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असताना त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही खा. लंके यांनी केला. पोलीस दलाची बदनामी करून कार्यक्षम अधिकाऱ्यांना नामोहरम करण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सिस्पे–इन्फिनिटी घोटाळ्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे खा. नीलेश लंके यांनी ठामपणे स्पष्ट केले. केवळ उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो म्हणून जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, “उद्घाटनाला उपस्थित राहणे म्हणजे घोटाळ्यात सहभागी असणे नव्हे,” असे त्यांनी सांगितले. आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी कोणालाही गुंतवणुकीस प्रवृत्त केले नसून, उलट ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी सातत्याने प्रयत्न केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून दबावतंत्र, धमक्या व खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीचा विचार महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. नगर शहराने शांतता, विकास आणि पारदर्शक कारभारासाठी या विचारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचार, रखडलेल्या विकास योजना, पाणीपुरवठा आणि मनमानी कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार खा. लंके यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post