अहिल्यानगर : संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटाला आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उद्धव महाराज मंडलीक नेवासेकर, देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुर्के तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटाचे नामकरण करण्यात आले.
या सोहळ्याला यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदयन गडाख, डॉ. निवेदिता गडाख यांच्यासह हजारो वारकरी, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात नामकरण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
घाटाच्या नामकरणाबरोबरच परिसराचे आध्यात्मिक स्वरूप अधिक उठावदार करण्यासाठी घाटाच्या पायथ्याशी संत ज्ञानेश्वर महाराजांचे भव्य शिल्प तसेच पैस खांबाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ही आकर्षक कलाकृती भाविकांसह येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून परिसराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा भूमीत रचलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गौरव केला. या नामकरणामुळे इमामपूर घाटाला संत साहित्य, वारकरी परंपरा आणि अध्यात्माशी जोडणारी नवी ओळख मिळणार असून भाविकांसाठी हे ठिकाण अधिक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमानंतर वारकऱ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ‘ज्ञानेश्वरी घाट’ हे नाव आता वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे नवे प्रतीक ठरणार आहे.

Post a Comment