कुकडीच्या आवर्तनाचा प्रश्न सुटेल... 17 तारखेला सुनावणी हाेऊन आपल्या बाजुने निर्णय लागण्याची अपेक्षा... शेलार


कर्जत ः
कुकडीच्या आवर्तनाचे पाणी हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. परंतु पाणी सुटले पाहिजे, ही सर्वांची मागणी आहे. नऊ मेला पाणी सुटणार होते, पण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने 17 तारखेला सुनावणी होऊन आपल्या बाजुने निर्णय लागेल,  अशी अपेक्षा आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर जास्त भाष्य करणे उचित नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी सांगितले.

कुकडीच्या कालवा सल्लागार समितीतीवर कर्जत-जामखेडचे प्रतिनिधी म्हणून कर्जत-जामखेडच्या नेत्यांऐवजी  श्रीगोंद्याचे घनश्याम शेलार यांची निवड आमदार रोहित पवार यांनी केली. यावर भाजपचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सचिन पोटरे यांनी प्रसिद्धी पत्रक काढले होते. त्यावर पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी सुनील शेलार, विशाल मेहेत्रे, सचिन सोनमाळी, पृथ्वीराज चव्हाण आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले की, कोरोना काळात कोणीही राजकारण करू नये. माजीमंत्री राम शिंदे हे मंत्री होते. त्यांनी त्यावेळी समान न्याय पाणी वाटपाचा निर्णय का घेतला नाही. आता फक्त सोशल मीडियावर विरोध करीत आहेत. सध्या कोरोना काळ सुरू असताना त्यांनी काय मदत केली. हे माजीमंत्री व खासदारांनी सांगावे फक्त भेट देऊन भागते का? असा आमचा सवाल आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून काय साध्य होईल भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष काय मदत केली. कालवा सल्लागार समितीवर कर्जत-जामखेड मतदार संघाचे प्रतिनिधी म्हणून आमदार रोहित पवार यांनी श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची निवड होणे यात आम्हाला काहीही अडचण नाही. त्यांचा त्या क्षेत्रात अभ्यास आहे.

भाजपचे 15 वर्ष आमदार सदाशिव लोखंडे हे चेंबूर मुंबईचे होते आणि आता खासदार डॉ. सुजय विखे हे उत्तरेचे आहे. ते चालतात मग मतदारसंघाच्या लगतचे घनश्याम शेलार का चालत नाहीत. आमदार रोहित पवार यांनी कोरोनाच्या बिकट परिस्थितीत सुद्धा मतदारसंघात कोट्यवधीची विकास कामे केली असून नुसते शासकीय निधीवर अवलंबून न राहता सीएसआर मधून कामे केली आहेत.

सध्याच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये, म्हणून कर्जत व जामखेड येथे लवकरच ऑक्सिजन प्लॅंट उभारण्याचे काम सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे यांनी यावेळी सांगितले. भाजपाचे काही कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी हे राजकारण करण्यापेक्षा सामान्य लोकांच्या मदतीसाठी पुढे यावे असे मेहेत्रे यांनी सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post