श्रीगोंदा : कोरोना महामारी व आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना त्वरित मदत न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.
रयत क्रांती संघटनेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, एक वर्षापासून राज्यातील नागरिक कोरोना व नैसर्गिक आपत्ती व बेजबाबदार राज्य सरकारमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. तसेच छोटे व्यवसायिक सुद्धा प्रचंड अडचणीत आले आहेत.
आत्तापर्यंत झालेल्या कर्ज माफीमध्ये लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत थकित कर्ज माफी करण्यात यावी व तात्काळ पीक कर्ज देण्यात यावे, छोटे उद्योजक व व्यावसायिक यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत करण्यात यावी, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा, कोरोना रुग्णांना सरसकट महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा, पात्र रुग्णांचे पैसे ज्या हॉस्पिटलने घेतले असतील ते पैसे रुग्णांना परत मिळवण्याचे आदेश व्हावेत, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज माफी मिळावी, आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास लॉकडाउन उठल्यानंतर तीव्र आंदोलन राज्यभर करण्यात येतील असे निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment