पारनेरातील सहा गावातील पाणी प्रश्न सुटला... पाणी योजनेसाठी 30 कोटीचा निधी मंजूर... आमदार नीलेश लंके यांची माहिती...


पारनेर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील जामगावसह दैठणे गुंजाळ, वडगाव आमली, भांडगाव, सारोळा आडवाई  व काळकूप प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी 30 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे या सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार निलेश लंके यांनी दिली.

जामगावसह सहा गावांचा पिण्याच्या पाणी पुरवठा योजनांपैकी बहुतांशी गावांच्या पाणीपुरवठा योजना भांडगाव लघुप्रकल्पातून कार्यान्वित होत्या. मात्र येथे शाश्वत पाणीसाठा उपलब्ध नसल्याने या योजना अनेक वर्षांपासून बंदच होत्या.

आमदार नीलेश लंके हे विधानसभा सदस्य झाल्यानंतर या गावांना काळु धरणातून पाणीपुरवठा व्हावा यासाठी ते प्रयत्नशिल होते. यासाठी त्यांनी संबंधित गावांच्या बैठका घेवून तशा प्रकारचे ग्रामसभेचे ठरावही करून घेतले होते. 

जामगावसह सहा गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार नीलेश लंके यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 

संबंधित योजनेतील गावे ही अवर्षणप्रवणग्रस्त व दुष्काळी असल्याने या ठिकाणी शाश्वत पाणीपुरवठा योजना राबविण्यात यावी अशी मागणीही आमदार नीलेश लंके यांनी पाणी पुरवठा मंत्री पाटील यांच्याकडे केली होती. 

आमदार नीलेश लंके यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून आता सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

सहा गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ३० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली असून लवकरच जीवन प्राधिकरण विभागाकडून सर्वेक्षण सुरू होणार असून या योजनेसाठी वाढीव निधी लागल्यास त्याचीही तरतुद करण्यात येणार आहे. 

येत्या दोन -तीन महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याची माहितीही आमदार नीलेश लंके यांनी दिली. 

दरम्यान आमदार नीलेश लंके यांनी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी निधी मंजूर करून आणल्याबद्दल सहा गावातील ग्रामस्थांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post