राहुरी : तालुक्यात रविवारी (ता. 27) ला राहुरी शहरासह तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे राहुरी रेल्वे स्टेशनच्या नवीन झालेल्या भुयारी मार्गात जवळपास साठले होते. या पाण्यातून दुचाकी व चारचाकी वाहने नेण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे तालुक्यातील काही भागात खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. जोरदार पावसाची शेतकरी आभाळाकडे डोळे लागून बसले होते.
रविवारी (ता. 27)ला राहुरी शहरासह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकर्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या पावसाने शहरासह परिसरात पाणीच पाणी झाले आहे. राहुरी रेल्वे स्टेशनच्या नवीन झालेल्या भुयारी मार्गात जवळपास तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साठल्याने राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील वाहन चालकांना आपली वाहने या पाण्यातून नेताना मोठी कसरत करावी लागत आहे.
या भुयारी मार्गाचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असून फक्त एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे.
दुसऱ्या बाजुने रस्त्याचे काम सुरू असल्याने खोदलेली माती पूर्णपणे या भुयारात आल्याने पाणी व गाळ यातून वाहन चालकांना मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे.
या पुलाचे काम वेगाने करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. रेल्वे पुलाच्या खालून वाहने काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली.
Post a Comment