आई माझं जगं....


रामदास पुजारी  यांच्या काकू म्हणजेच माझ्या गुरूवर्या आदरणीय पुजारी मॅडम यांच्याकडून 'आई माझं जग' हा रामदास पुजारी लिखित काव्यसंग्रह मला मिळाला. काव्यसंग्रह हाती मिळताच मी थेट घर गाठले. माझ्या हातातील पुस्तक बघून माझ्या दोन चिमुकल्या मुलींनी कुतुहलाने माझ्या हातातील पुस्तक घेतले व मुखपृष्ठ न्याहळत बसल्या.


सुरेख अशा मुखपृष्ठावरून किलकिलत्या नजरा फिरत होत्या. फुलोऱ्यात आलेल्या बटाच्याचे पिक, निळेशार आकाश न्याहळत असताना आदरणीय पुजारी सर यांच्या मातोश्रींच्या प्रतिमेवर दोघींच्याही नजरा स्थिरावल्या अन् चिमुकल्या हातांनी त्या प्रतिमेला वंदन केले आणि धावतच माझ्याकडे येऊन म्हणाल्या, बाबा... बाबा आभाळात देवी आहे.

मुलींचे विलक्षण निरिक्षण बघून मीही थक्क झालो.कोणत्याही लेकराला आई ही भगवंतच वाटत असते. नयन पटलांवरून असंख्य भाव क्षणात सरकून गेले, हेवा वाटला मुलींचा अन् अभिमानाने उर भरून आला.त्या कोवळ्या निरक्षर लेकरांनी मुखपृष्ठावरून पुस्तकात काय दडले आहे हेच जणू मला सांगितले होतेे. पुढे एक एक रचना वाचत असताना तंतोतंत या गोष्टीचा मला अनुभव येत होता.

'आई माझं जग' हा काव्यसंग्रह वाचत असताना हळूहळू लक्षात यायला लागलं होतं की,कवीने काव्याप्रति राखलेली निष्ठा अवर्णनीय आहे.सदर संग्रहातील रचना या ग्रामीण भागातील वस्तुस्थिती मांडणाऱ्या असून शेती-मातीत राबणाऱ्या आईच्या आठवणीत कवीचे हळवे मन मला पानोपानी विखुरलेले दिसले.

अनेक अडचणींचा सामना करत आई आपल्या बाळाचा सांभाळ करत असते.आपल्या बाळाला  मोठे करण्याची जबाबदारी मोठ्या हौसेने  पार पाडत असते.आईपणाचे कर्तव्य पार पाडत असताना ती वेळप्रसंगी आपल्या जीवाचीही बाजी लावत असते.म्हणूनच आई ही कुबेरापेक्षाही माया,ममतेने धनवान असते.

आई नुसतं आपल्या बाळाला जन्मच देत नाही तर त्याचे पालनपोषण करत असताना त्याला सत्याचा मार्ग दाखवते आणि समाजाप्रति प्रेम,माया,बलिदान, त्याग, समर्पण देण्यास सशक्त बनवते.तसेच स्वार्थ, हव्यास, क्रोध, घृणा या विघातक वृत्तींपासून त्याला कोसो दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असते.म्हणूनच की काय बाळाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी जगाच्या निर्मात्याने प्रत्येक घरात आई निर्माण केली असावी.

जीवाचा आटापिटा करून आपल्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र राब राब राबणारी आई जेव्हा जगाचा निरोप घेते तेव्हा मातृ प्रेमास आसुसलेला कवी क्षणात कोलमडून पडतो,मनात आठवांसोबत भावनांची वादळे उठतात.दिवसामागून दिवस येतात अन् निघून जातात परंतु कवीला आई मात्र कधीच दिसत नाही.आईला पाहताच हर्षोल्हासित होणाऱ्या मातृवेड्या कवीला आता आई कधीच दिसणार नाही याची खंत क्षणोक्षणी जाणवत राहते.तेव्हा कवी म्हणतात की...

उन्हाळा संपेल -

पावसाळा सुरू होईल

वळवाचे आगमन होईल

मृगाच्या सरी कोसळतील...

मृदगंध सर्वत्र पसरेल

वातावरण कसं फुलून येईल

पण मन माझं उदास असेल

तू नसल्याने.

आयुष्यात आईचे स्थान जेवढे महत्त्वाचे बापही तेवढाच मौल्यवान असतो.अवघे आयुष्य मातीशी प्रामाणीक राहीलेला बाप दिवस-रात्र काळजाचे पाणी करून घरगाडा हाकत राहतो.गरीबीशी दोन हात करत असताना मुलांचे शिक्षण, कपडालत्ता, खाणंपिणं भागवताना बापाच्या काळजाची झालेली दमछाक कविला हरघडी आठवत राहते.उभ्या हयातीत कष्टाशी प्रामाणीक राहीलेल्या आपल्या प्रिय बापाला भावपूर्ण आदरांजली वाहताना म्हणतात की...

आठवतो आम्ही तुम्हा-

निशिदिनी,हरघडी,पावलोपावली

तुमचे आचार-विचार

विनम्रपणा,निरागसपणा,

प्रामाणिकपणा सारं काही

आठवतो आम्ही

आठवून तुम्हाला ओलावतात

आमच्या डोळ्यांच्या कडा....

अशा या ओळी वाचल्या की,मन सुन्न होऊन जातं.सदर काव्यसंग्रह तीन भागांत विभागला गेलेला आहे.पाहिल्या विभागात आई,दुसऱ्या विभागात निसर्ग तर तिसऱ्या विभागात समाजव्यवस्थेशी निगडीत कविता आहे.

कवी हे स्वतः वन अधिकारी असल्यामुळे निसर्ग हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे.वृक्षतोडीमुळे पर्यावणाचा  झालेला ऱ्हास काही अंशी भरून काढण्यासाठी,पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करणे खूप गरजेचे आहे.

असे कविला वाटते. वृक्षतोडीचे दुष्परिणाम पुढच्या पिढीला भोगावे लागणार हे त्रिकाल सत्य आहे.म्हणूनच जीवसृष्टीचं रक्षण करण्यासाठी झाडांची  होणारी तोड थांबली पाहिजे व पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावली पाहीजे असे  कवीला वाटते.

वृक्षारोपणाचा ध्यास घेऊन  कवी वसुंधरेचं गतवैभव परत आणण्यासाठी धडपड करताना दिसतात.आपण लावलेलं झाड काय काय करू शकतं हे सांगताना  'माझं  झाड' या कवितेत कवी म्हणतात की...

माणसांना,पशुपक्ष्यांना

सावली देईल माझं झाड

श्वसनासाठी शुद्ध हवा

पुरविल माझं झाड

जीवसृष्टीचं साऱ्या रक्षण

करील माझं झाड...

या कवितेतून कवीचे पर्यावरणावरील प्रेम ठळकपणे दिसून येते.अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सदर काव्यसंग्रह कविच्या आईवरील व वसुंधरेवरील उत्कट प्रेमातून साकारलेला असून वाचकांनी निसर्गाच्या विविध रूपांशी  एकरूप व्हावे हा संदेश देणारा आहे.कवी रामदास पुजारी यांच्या कसदार लेखणीतून पाझरणारा शब्द न् शब्द वाचकांच्या काळजाला भिडणारा आहे.

'मी ऋणी आहे' या कवितेतून त्यांनी आईवडील,सगेसोयरे, पशुपक्षी,शेती-माती,फळे-फुले, डोंगरदऱ्या,उन-वारा,पाटी-पेन्सील अशा विविध घटकांचे ऋण व्यक्त केले आहे आणि ते व्यक्त करत असताना कवीने अगदी गवताच्या पात्याचेही विनम्रपणे आभार मानले आहे.या उल्लेखनीय बाबीचा येथे आवर्जुन उल्लेख करावा वाटतो.कवी रामदास पुजारी यांच्या सर्वच कविता काळजातून येणाऱ्या  आहेत.या सर्व कविता वाचत असताना कोठेही शब्दांची ओढाताण व उसनेपणा जाणवत नाही.

✍️संदिप राठोड

   निघोज,जि.अहमदनगर

   ९९२२६६३५९५


कविता संग्रह - आई माझं जग

कवी - श्री रामदास पुजारी

प्रकाशन - वेदान्तश्री प्रकाशन,पुणे

पृष्ठ - ११२

स्वागतमूल्य - १२०

1/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post