संगमनेर : संगमनेर तालुक्यातील खांडगाव ते पेमगिरी हा संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला आहे. प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. रस्त्याला खड्डेच खड्डे पडल्याने तसेच आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे त्या खड्यात पाणी साचलेले आहे.परिणामी वाहन चालकाला वाहने चालवताना खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव जास्त आहे. या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, अन्यथा रस्त्यावर पडलेल्या खड्यावर वृक्षारोपण करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा कार्यकर्ते आशिष कानवडे, क्रांतीसेनेचे युवराज सातपुते, अमित कोल्हे, बाळासाहेब भोर यांनी दिला आहे.
हा रस्ता खांडगाव पासून निमज-धांदरफळ -निमगाव पागा व शेवटी पेमगिरीला जातो.एकूण 20 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. या रस्त्यावर प्रामुख्याने स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरी येथे वटवृक्ष व शहागडावर येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ जास्त असते. तसेच ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी उद्योग, व्यवसाय व नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना खराब रस्त्यामुळे व वेळेत कामावर न पोहोचल्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पेट्रोल बरोबर ग्राहकांकडून टॅक्स वसुल करणारे, तसेच नवीन वाहने विकत घेतानाही रोड टॅक्स घेतला जातो. मग नागरिकांच्या मूलभूत सुविधांच रक्षण कोणी करायचे असा प्रश्न सर्वांना पडत आहे.
खड्डे पडलेल्या रस्त्यावर कधी कधी भयानक अपघात होऊ शकतात याची जबाबदारी कोण घेणार? प्रत्येक वेळी रस्त्याची फक्त तात्पुरती डागडुजी केली जाते. त्यामुळे रस्ता पुन्हा लवकरच खराब होतो.
प्रशासनातील संबंधित विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे काम सुरु करावे, अन्यथा रस्त्यावर पडलेल्या खड्यावर वृक्षारोपण करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा कार्यकर्ते आशिष कानवडे, क्रांतीसेनेचे युवराज सातपुते, अमित कोल्हे, बाळासाहेब भोर यांनी दिला आहे.
Post a Comment