पाथर्डी ः कोकण, कोल्हापूर व सातारा येथील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागासाठी शासकीय निकषानुसार मदतीऐवजी खास बाब म्हणून मदत देण्याचा जो निर्णय झाला. त्याच धर्तीवर पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधितांना खास बाब म्हणून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी आज मुंबई मंत्रालय येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन केली.
पाथर्डी व शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी होऊन पुरामुळे शेती व घरांचे तसेच विकास कामांची, मनुष्याच्या जीवित हानीसह घराची पडझड, पुराचे पाणी घरात शिरून, संसार उपयोगी साहित्य, धान्य, जनावरांचे मृत्यू, पिकांची पुर्णतः हानी, शेतजमिनीचे नुकसान यांचे विदारक व वस्तुस्थितीची राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व मदत पुर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांची मुंबई येथे मंत्रालयात समक भेट घेऊन सविस्तर माहिती दिली.
अतितातडीच्या मदतीसाठी पंचनामे झालेल्या व नुकसान झालेल्या बाबींची शासकीय निकषानुसार नुकसान भरपाई न देता कोकण व कोल्हापूर, सातारा भागासाठी विशेष बाब म्हणून अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे खास बाब म्हणून पाथर्डी व शेवगावच्या अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना व पूर पीडितांना भरघोस मदत मिळावी यासाठी आग्रह धरला. तसेच पालकमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांकडून फक्त आढावा न घेता प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, अशी विनंती केली.
याबाबत सविस्तर माहिती व अहवाल प्राप्त करून घेऊन कोकण व कोल्हापूरच्या धर्तीवर मदत देण्याचे आश्वासन यावेळी मंत्र्यांनी दिले. तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल प्राप्त केले जातील असे सांगून जिल्हाधिकारी अहमदनगर यांना सरसकट पंचनामे करण्याचा आदेश पत्राद्वारे दिले.
दोन्ही मंत्र्याबरोबर चर्चा सकारत्मक झाली असून आपल्या मागणीची दखल घेऊन लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे अश्वासन मुश्रीफ व वडेट्टीवार यांनी दिले असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.
Post a Comment