मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने व कंपन्यांवर इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाने छापे टाकल्याची कबुली खुद्द अजित पवार यांनी दिली आहे. परंतु त्याबरोबरच त्यांच्या बहिणींच्या कंपन्यांवरही छापे टाकण्यात आल्याने अजित पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अजित पवार म्हणाले की, आयटीने कुठे छापे टाकावेत हा त्यांचा अधिकार आहे. काही शंका असल्यास ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी राखायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे.
माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळी भरला जातो. त्यामुळे हे सर्व छापे राजकीय हेतूने टाकले की इन्कम टॅक्सलाच खरोखरच काही तपास करायचा होता हे माहीत नाही, असे उपमुख्यमंत्री म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले माझ्याशी संबंधित कंपन्यांवर छापे टाकल्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. ज्यांची ३५-४० वर्षापूर्वी लग्न झाली. ज्यांचे संसार चांगल्या पद्धतीने सुरू आहेत, त्या माझ्या तीन बहिणींशी संबंधित कंपन्या आणि कार्यालयावरही छापे टाकण्यात आले आहेत.
कोल्हापूर आणि पुण्यात हे छापे टाकण्यात आले आहेत. त्याचे कारण मला माहिती नाही. पण मला त्याचं दु:ख आहे. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून हे छापे टाकले गेले असतील तर राज्यातील जनतेने याचा जरूर विचार करावा. कोणत्या थराला जाऊन या संस्थांचा वापर केला जातोय हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर छापे पडल्याने अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकार आता इडी व इन्कम टॅक्सचे छापे टाकून राज्यातील नेत्यांना मुद्दाम जेरीस आणत असल्याची प्रतिक्रिया उमठू लागली आहे. ही लोकशाही नसून हुकूमशाही झाल्याचेही यावेळी अनेकांनी मत व्यक्त केले.
Post a Comment