नगर : महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंदमध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये, असे आवाहन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याखंड झाले होते. तसेच मावळचा गोळीबार हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. शेतकऱ्यांवर सतत अन्याय करणाऱ्या व सध्या देखील अनेक जिल्ह्यात तसेच पूर परिस्थिती असताना शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन देखील या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कवडीचीही मदत दिली गेली नाही.
आपल्या ही जिल्ह्यातील अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने कुठलीच नुकसान भरपाई तर दिलीच नाही. उलट थकीत बिलांच्या पैशासाठी महावितरण च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे वीज जोड कट करण्याचे काम चालू आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम चालू आहे शेतकऱ्यांना वेळेवर जळलेले रोहित्र बदलून मिळत नाहीत.
महाराष्ट्रात रोज बलात्काराची प्रकरणे समोर येत असताना येथील महिला व मुली सुरक्षित नाहीत.तसेच गेली दोन वर्षे कोरोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आत्ताशी कुठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून तोट्यात गेलेले व्यवसाय या सणासुदीच्या दिवसात मार्गी लागत असल्याचे दिसू लागले आहे.
त्यातच हा बंद व्यापाऱ्यांच्या मुळावर बसणार असून त्यांचे व्यवसाय वाढण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून तुम्ही राज्य शासन चालवणारे शासनकर्ते यांनी उत्तर प्रदेशच्या घटनेचा निषेध केला असता तर समजू शकले असते. परंतु राज्यकर्त्यांनी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा हा बहुधा पहिलाच कटू प्रसंग असावा.
म्हणून भारतीय जनता पार्टीच्यावतीने शेतकरी व व्यापारी यांना आवाहन करण्यात येते की कृपया या बंदमध्ये सामील न होता रोज या सरकारच्या मंत्र्यांवर होणारे आरोप व भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडत असताना यावरील लक्ष हटवण्यासाठी केलेला हा बालिश प्रयत्न आहे.
त्यांनी या बंदमध्ये सामील न होता, महाआघाडी सरकारचा निषेध करावा व प्रशासनाने देखील सक्तीने बंद करणाऱ्या या प्रवृत्तींवर गुन्हे दाखल करून होणाऱ्या नुकसानी ची भरपाई वसूल करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment