मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे.
खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह असल्याचे रोहित पवार यांनी म्हणत या विषयावर ट्वीट करत भगतसिंह कोश्यारी यांच्या माफीची मागणी त्यांनी केली.
रोहित पवार म्हणाले, खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे. असे होत असताना गप्प बसणे हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना सोबत घेत आदर्श राज्य कारभार केला. सर्वसामान्य जनतेचे हित हीच त्यांची निती आणि शिकवण होती.
खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावे, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
Post a Comment