आमदार नीलेश लंके यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार... वनविभागाच्या कामांची आमदार लंके, जिल्हाधिकारी, वनसंरक्षक पाहणी करणार...

पारनेर : जिल्हा स्तरीय बिगर आदीवासी योजनेअंतर्गत वनविभागामार्फत पारनेर तालुक्यात राबविण्यात आलेल्या मृद व जलसंधारणाच्या कामांमध्ये झालेल्या लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची शहानिशा करण्यात येणार आहे.  


आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली असून आता आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा वनसंरक्षक स्वाती माने यांची त्रिसदस्यीय समिती सर्व कामांची पाहणी करणार आहे. 

वनक्षेत्रातील मृद व जलसंधारणाची कामे ४४०६/३२२१ योजनेअंतर्गत गॅबियन बंधारे व मातीनाल बांध या कामांसाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडून १ कोटी २२ लाख ४२ हजार ११७ रुपये इतकी रक्कम पारनेर वन क्षेत्रातील मौजे सुपे, वाळवणे, रूईछत्रपती, पळवे बुद्रुक तसेच इतर गावांमध्ये  राबविण्यासाठी नगरचे उपवनसंरक्षक  यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती.  दरम्यान, वनविभागातील भ्रष्ट्राचारासंदर्भात आमदार नीलेश लंके यांनी यापूर्वीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या तक्रारीत आ. लंके यांनी नमुद करण्यात आले आहे  की, मातीनाल बांध व गॅबियन बंधाऱ्यांची कामे शासन नियमानुसार योग्य ती प्रक्रिया करून त्याबाबतच्या निविदा प्रसिध्द करणे गरजेचे होते. परंतू तसे न करता काहींनी पदाचा गैरवापर करून खोट्या निविदा काढून परस्पर कामांचे वाटपही केले आहे.

गॅबियन बंधारे ज्या मजुरांनी तयार केले आहेत, त्या मजुरांच्या नावावर मजुरी आदा न करता खोट्या मजुरांची नावे वापरून रोखा लेखा तयार करण्यात आला. त्यावर वनरक्षक व वनपालांच्या स्वाक्षऱ्या न घेता उपवनसंरक्षक अहमदनगर यांच्या कार्यालयास सादर करण्यात आले. 

माती नाला बांध कामाच्या बी एक  निविदा  प्रक्रियेमध्ये वनरक्षक, वनपाल यांना सहभागी न करता, त्यांना विश्‍वासात न घेता परस्पर कामांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुपे येथील वनपरिमंडळ अधिकारी एस. एस. भोसले यांनीच या निधीमध्ये घोटाळा झाल्याची तक्रार आमदार नीलेश लंके यांच्याकडे केलेली आहे. 

या कामासाठी वापरला  जाणारा पैसा हा जनतेचा असून सबंधित अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करून जनतेचा पैसा लुटण्याचे काम करीत आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्यामार्फत समितीची स्थापना करून, लाचलुचपत विभागामार्फत योग्य ती चौकशी करून सबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल  करण्याची मागणी आमदार लंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

तक्रारदार एस. एस. भोसले यांच्या जिवितास धोका झाल्यास, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला गेल्यास संबंधितांना  जबाबदार धरण्यात यावे असे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली असल्याचे लंके यांनी या पत्रात नमुद केले होते. 

आ. लंके यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात येऊन आता त्रिसदस्यीय समिती या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post