एसटीचा आज संप मिटणार...

मुंबई : विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली एस टी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात विधानभवनात बैठक घेण्यात आली आहे. 


या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटी संप मिटण्याची शक्यता आहे. विधानपरिषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत आज सकाळी 10 वाजता सभागृहात माहिती देणार आहे.एसटी संपाबाबत विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या निर्देशानुसार आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे. 

काल सभापतींनी समिती स्थापन करुन आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आमदारांची समिती स्थापन करण्यात आली. 10 मार्चच्या अल्टिमेटम अगोदर आज एसटी संपासंदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, प्रविण दरेकर शेखर चन्ने बैठकीला उपस्थित होते.

विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. पण, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. तोच अहवाल विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला. 

एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण शक्य नसल्याचे अहवालात म्हटले आहे. पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही विलिनीकरणाची मागणी लावून धरत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप 28 ऑक्टोबरला सुरू झाला होता. गेल्या 100 दिवसांहून अधिक काळासाठी राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीची वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. 

एसटी महामंडळाचे या संपामुळे तब्बल 1600 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या 82 हजार 498 कर्मचाऱ्यांपैकी 54 हजार 396 कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आजवर सर्वाधिक काळ चाललेला हा संप आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post