एम. व्ही. पाटील
नगर ः राज्यातील राज्यातील आघाडी सरकार पडून भाजपाचे सरकार सत्तेत आलेेले आहे. मात्र अदयाप मंत्री मंडळाचा विस्तार झालेला नाही. नव्याने होणाऱ्या मंत्री मंडळात जिल्ह्यातील माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री राम शिंदे, माजी मंत्री राधाकृष्ण विखे व आमदार मोनिका राजळे यांची नावे चर्चेत येऊ लागलेली आहे. मात्र जिल्ह्याला एकच मंत्री पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काहींनी मंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचे आपल्या हितचिंतकांना हाताशी धरून प्रचार व प्रसार केला.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट भाजपाने सरकार स्थापन केलेले आहे. या सरकार स्थापनेनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत. सध्या शिवसेना व शिंदे गट यांच्यात न्यायालयीन लढाई सुरु झालेली आहे. या लढाईत कोणाचा विजय होईल, अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र हा वाद चांगलाच पेटलेला आहे.
जिल्ह्यातून मंत्री म्हणून माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री राम शिंदे व आमदार मोनिका राजळे यांना मिळू शकते, असे त्यांच्या समर्थकांमधून बोलले जात आहे. राहाता, शेवगाव-पाथर्डी, कर्जत व जामखेड, श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमधून चर्चेला उधाण आलेले आहे. प्रत्येकाने आता त्यावर पैजा लावण्यास सुरवात केलेली आहे.
सध्या विखे व शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. आमदार मोनिका राजळे यांना संधी मिळेल, अशी चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु झाली आहे. जिल्ह्यात तीन मंत्री पद मिळाल्यास आगामी काळात भाजपाची ताकद वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा चांगला परिणाम जिल्हा परिषदेत निवडणुकीत दिसून येणार आहे.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळून झेडपीवर भाजपा आपला झेंडा यातीन मंत्र्यांच्या माध्यमातून फडकावू शकतात, अशी चर्चा आता सुरु झालेली आहे. असे असले तरी नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाला बऱ्याच जिल्हयात मंत्री पदाची खिरापत वाटणार आहे. त्यामुळे आता कोणाला किती संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment