शिवरायांचा अवमान केल्यास सोडणार नाही...

जळगाव ः शिवरायांबद्दल कोणीही वाकड तिकडे बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेले खड्ड्यात यांना सोडणार नाही, असा इशाराच मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य केल्यामुळे प्रसाद लाड यांचाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही.

चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू आहे. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत, त्याने जनतेचे पोट भरत नाही.  मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इमान विकलेल्या लोकांचे सरकार लवकरच पडेल अशी टीका केली आहे. त्यालाही पाटील यांनी जोरदार उत्तर दिले. ते वारंवार सरकार पडणार असल्याचं सांगत आहे.  मीही किती दिवसांपासून तीच वाट पाहत आहे. सरकार म्हणजे काय डोंबाऱ्याचा खेळ आहे का? पोरगी वर दोरीवर चालतेय आणि खाली डोंबारी वाजवतोय. वाजू द्या. त्यांना काय वाजवायचं ते वाजू द्या, अशी टीका त्यांनी आदित्य ठाकरेंवर केली.

जिल्हा दूध संघाचे निवडणूक आदेश दोनच दिवसात पुन्हा बदलल्याने एकनाथ खडसेंनी ही लोकशाहीची टिंगल असून हा सरकारचा निर्लज्जपणा असल्याची टीका केली होती. या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. आदेश हे सरकारने काढले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढलेले नाहीत. ते विरोधक असल्याने माझ्यावर टीकाच करतील. माझी आरती करतील का? असा चिमटा त्यांनी काढला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post