शिंदे गट भाजपात जाणार...

मुंबई : येत्या १५ दिवसांत २० ते २५ आमदारांचा शिंदे गट-भाजपात प्रवेश होऊ शकतो, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे, असेही माजी मंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.


राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास शिंदे गट आणि भाजपाकडून व्यक्त केला जातो. असे असतानाच आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. 

कडू म्हणाले की, सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतिबहुमतामध्ये आहे. म्हणजेच २० ते २५ आमदार इकडे-तिकडे झाले, तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील काही आमदार आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. 

मंत्रिमंडळ विस्तार कोर्टाकडून दिली जाणारी तारीख व आमदारांचा पक्षप्रवेश यामुळेच लांबतो आहे. दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. 

ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येणार आहेत, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post