नाशिक : मी यांच्या बापाला कधीही घाबरलो नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी जंगजंग पछाडले होते. मात्र, मी जेलमध्ये गेलो नाही. ज्यांच्यावर जबाबदारी होते, तेच जेलमध्ये गेले, असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
भाजपची नाशिकमध्ये महत्त्वाची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री, आमदार, खासदारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही संकल्प करण्यात आला.
फडणवीस म्हणाले की, आम्ही 2024 साठी 20-20 ची बॅटिंग सुरू केली आहे. आगामी निवडणुका शिंदे व आम्ही एकत्रित लढू आणि जिंकू देखील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जी जबाबदारी भाजपमध्ये आपल्याला मिळाली. त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीची सेवा करणे हा आपला धर्म आहे. ज्या योजना आपण बोलत आहोत. या सर्व योजना अन्त्योदयाच्या आहेत. आपल्याला काही गोष्टींचा त्याग करायला हवा. यामध्ये अहंकाराचा त्याग पहिल्यांदा करावा लागेल. तरच खऱ्या अर्थाने सर्मपण दिन साजरा करू शकतो, असे ते म्हणाले.
आता ट्वेंटी-ट्वेंटी मॅच सुरू केली असून आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवा संकल्प साकारण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. पदं मिळतील, मिळणार नाहीत, पुढच्या निवडणुकीपर्यंत सर्व सोडा, सेवा करून लोकांचा विश्वास संपादन करा, त्यानंतर वर्षानुवर्ष जनता आपल्याला सत्तेमध्ये ठेवेल, त्यामुळे आता आपण बॅटिंग सुरू केलीय, 2024 ला आपणच मॅच जिंकणार असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
जर सर्वोच्च न्यायालयाने यांच्या बाजूने निकाल दिला तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आणि जर यांच्या बाजूने निकाल दिला नाही तर दबावाखाली निकाल दिला असं म्हटलं जातं. देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्न उपस्थित करण्याचे काम विरोधक करत आहेत.
हे खरं म्हणजे विरोधकांचं फस्ट्रेशन आहे. आगामी निवडणुका त्यापेक्षा दीडपट जास्त जागा घेऊ, कारण जनता आपल्या सोबत आहे. शिंदे भाजप सरकारने केवळ सहा महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना भरीव मदत दिली आहे. त्या सरकारने केवळ घोषणा केल्या. एक रुपयाही शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला नाही.
Post a Comment