मुंबई ः निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे.
धनुष्यबाण चिन्ह आपल्याला मिळावं यासाठी दोन्हीही गट गेली दोन महिने कागदोपत्री पुरावे सादर करण्यात व्यस्त होते. तीच कागदपत्रं पाहून निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे.
यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते. शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते.
मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय टाकून त्यांना शिवसेना हे नाव दिले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे.
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी 1968 साली पक्षाची राजकीय संघटना म्हणून नोंद केली होती. डरकाळी फोडणारा वाघ ही सेनेची आधी ओळख होती. पण निवडणूक आयोगाच्या यादीत हे चिन्ह नव्हते. त्यामुळे त्यांना ते मिळालं नाही. शिवसेनेने पहिल्यांदा ठाणे पालिकेची निवडणूक लढवली होती. तेव्हा शिवसेनेने ढाल तलवार हे चिन्ह घेतले होते.
शिवसेनेची वाटचाल
1968 ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात मिरवणुकीत धनुष्यबाण घेतलेले राम लक्ष्मण प्रसिद्ध झाले होते. या निवडणुकीत देखील शिवसेनेनी ढाल तलवार या चिन्हावर निवडणूक लढवली होती. पण मिरवणुकीत राम-लक्ष्मण बनलेल्यांच्या हातात धनुष्यबाण होता. ती अधिक चर्चेत राहिली.
परळचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर पोटनिवडणूक शिवसेनेने पहिला विजय मिळवला. शिवसेनेचा पहिला आमदार विधानसभेत गेला. बाळासाहेबांनी परळचे नगरसेवक वामनराव महाडिक यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेचे उमेदवार असलेल्या वामनराव महाडिक यांचं चिन्ह होते उगवता सूर्य. त्यांच्या विजयामुळेच शिवसेना नावाच्या पक्षाचा राजकीय उदय झाला असे देखील बोलले गेले.
शिवसेनेच्या उमेदवार वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांवर काही दिवस लढावं लागत होतं. 'उगवता सूर्य' कधी 'धनुष्यबाण' तर कधी 'ढाल तलवार' यांचा समावेश होता.
1978 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनाला निवडणूक आयोगाकडून रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात आले होते. प्रचाराची सुरुवात रेल्वे इंजिनची पूजा करत करण्यात आली. मुंबईतील कोकणी माणसाचे वर्चस्व पाहता प्रचारात कोकण रेल्वेला शिवसेनेचे इंजिन अशी साद घालण्यात आली होती. पण तेव्हा जनता पक्षाच्या लाटेत शिवसेनेचे रेल्वे इंजिन धावू शकले नाही.
1984 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या कमळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले होते. वामनराव महाडिक, मनोहर जोशी यांनी कमळच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.
1988 साली झालेल्या औरंगाबाद महापालिका निवडणुकांमध्ये मात्र पक्षाने अभूतपूर्व यश मिळवले. या निवडणुकीत त्यांचं चिन्ह होतं धनुष्यबाण. परभणी मधून उभे असलेले उमेदवार प्राध्यापक अशोक देशमुख यांनी धनुष्यबाण या चिन्हाची निवड केली होती. ते तब्बल 66 हजार मत घेऊन निवडून आले होते. या यशानंतर शिवसेनेने आपलं चिन्ह धनुष्यबाण ठरवलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. त्यानंतर जवळपास तीस वर्षे याच चिन्हावर शिवसेनेने अनेक निवडणुका लढवल्या.
Post a Comment