बारामती : हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा व नवीन चिन्ह घ्यायचे. त्याचा काही फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद झाला.
काँग्रेसचे गाय-वासरू चिन्ह होते, पण त्यांनी पंजा घेतला, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारले. आताही फरक पडणार नाही, काही दिवस चर्चा होत राहील, नंतर लोक विसरून जातील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निकालावर त्यांचं मत व्यक्त केले आहे.
शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
Post a Comment