मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 1 वाजता मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार आणि खासदारांनाही बोलावण्यात आले आहे. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीवर निर्णय घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर ठाकरे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पक्षासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये चलबिचल होऊ शकते. पक्ष पुन्हा डॅमेज होऊ शकत असल्याची भीती असल्याने आता ठाकरे गटाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर एक बैठक बोलावली असून या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आज काय मोठा निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
यावेळी निवडणूक आयोगाने कशाच्या आधारावर पक्षाचं चिन्हं आणि नाव शिंदे गटाला दिलं. त्याच्यावर विचार करण्यात येणार असून त्यानंतर आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Post a Comment