मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
विधानसभेतविरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे ७६० हेक्टरचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात २६८५ हेक्टरचे नुकसान झाले आहे. धुळे येथे ३१४४ हेक्टर, नंदूरबार येथे १५७६ हेक्टर, जळगाव येथे २१४ हेक्टर, अहमदनगर येथे ४१०० हेक्टर, बुलढाणा येथे ७७५ हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात ४७५ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तात्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकार शेतकऱ्यांना निश्चितच मदत देणार आहे. त्यामुळे किमान शेतकऱ्यांच्या विषयावर तरी राजकारण करू नका, असेही फडणवीस यांनी विरोधी पक्षाला बजावले.
Post a Comment